भदाडी नदीपात्रात वाळू चोरांनी पाडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:27+5:30

या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ असलेल्या नदीपात्रातून सालोड येथील वाळूचोरांनी हैदोस घातला आहे.

Sand thieves break loose in Bhadadi river basin | भदाडी नदीपात्रात वाळू चोरांनी पाडले भगदाड

भदाडी नदीपात्रात वाळू चोरांनी पाडले भगदाड

ठळक मुद्देप्रशासनापुढे आव्हान : नदीपात्रात शिल्लक केवळ माती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील विविध वाळूघाटांत मागील काही महिन्यांपासून वाळूतस्करांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. या चोरांच्या मुसक्या आवळण्यात महसूल विभागाला अपयश येत असल्याने लाखोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. वायगाव (नि.) नजीकच्या भदाडी नदीपात्रातून वाळूचोरांनी वाळूचा अवैधरीत्या वारेमाप उपसा चालविला आहे. परिणामी पात्रात केवळ मातीच शिल्लक राहिली आहे. वाळूवाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांचीही वाट लागत असून वाहनांच्या आवाजाने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वाळूचोरांवर कारवाई महसूल पोलीस प्रशासनापुढे आव्हान ठरली आहे.
वायगाव (नि.) जवळून भदाडी नदी वाहते. या नदीचा पुढे यशोदा नदीपात्राशी संगम झालेला आहे. भदाडी नदीचे नुकतेच खोलीकरण करण्यात आले. कोटींची गौण खनिज संपदा या नदीपात्रात आहे. या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ असलेल्या नदीपात्रातून सालोड येथील वाळूचोरांनी हैदोस घातला आहे. रात्रीतून नदीपात्रातून वाळूचा उपसा केला जात असून तयार केलेल्या वाटेवरून त्याची वाहतूकदेखील केली जात आहे. वाळू भरलेल्या वाहनांमुळे या परिसरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. येथून शेतकरी-शेतमजुरांना आवागमन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुर्दशेस कारणीभूत वाळूचोरांकडून शासकीय मालमत्तेच्या नुकसानापोटी विशषे दंड आकारणी करावी, अशीही मागणी होत आहे.

वाळूवाहतुकीकरिता तयार केल्या वाटा
नदीपात्रातून रात्रीच्या चंदेरी प्रकाशात चोरट्यांकडून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. उपसा केलेली वाळूची वाहतूक करीत शिरसगाव (ध) कडे जाणाऱ्या मार्गावरील दुसऱ्या कालव्याजवळ टाकली जाते. हीच वाळू अवजड वाहनांमध्ये भरून आजगावमार्गे पालोती-वर्धा अशी सालोड (हिरापूर) येथे विल्हेवाट लावली जाते. यामुळे आजगाव मार्गाची चाळण झाली आहे. शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

कालव्याची भिंत धोकादायक वळणावर
वाळू भरलेल्या जड वाहनांची शिरसगाव (ध.) मार्गावरील दुसºया कालव्याजवळून सातत्याने वाहतूक केली जात असल्याने कालव्याची भिंत खचण्याच्या स्थितीत असून यामुळे शेतकरी, शेतमजुरांना धोका होऊ शकतो. याकडे संबंधित विभागाची डोळेझाक आहे. वाळूचोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Sand thieves break loose in Bhadadi river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.