लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारीही सकाळपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली. यामध्ये जिल्ह्याभरातील आठही तालुक्यामध्ये सरासरी १४.८२ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसाने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ७३.७१ टक्के भरल्याने या प्रकल्पाची दोन गेट १० से.मी. उघडल्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.सध्या सर्वत्रच समाधान कारक पाऊस असल्याने पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसधारांनी दुपारी तीन वाजताच उसंत घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले. सततच्या पावसामुळे बऱ्याच भागातील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. आकाशात ढगांची गर्दी कायम असून दमदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.सध्या जिल्ह्यातील ११ मोठ्या जलाशयापैकी पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्प तसेच २० लघू व मध्यम जलाशयांपैकी आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी व रोठा दोन या सहाही जलाशयाच्या सांडव्यावरुण पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौदर्य बघण्यासाठी या कोरोनाकाळात त्रस्त झालेल्या नागरिकांची गर्दी उसळत आहे. काही पोहोण्याचाही आनंद लुटत आहे पण, त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.लघु, मध्यम जलाशयांची पाणीपातळी वाढलीजिल्ह्यातील २० लघू व मध्यम जलाशय असून पावसामुळे पाणीपातळीत चागलीच वाढ झाली आहे. आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२ व परसोडी ही जलाशये ९० टक्के पेक्षा अधिक भरलेली आहेत. तर लहादेवी, रोठा-१ व कन्नमवारग्राम या तीन जलाशातील पाणीपातळी ८० टक्के पेक्षा जास्त असून कवाडी, सावंगी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, कुऱ्हा, आष्टी, पिलापूर, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या जलाशयातील पाणी पातळी ८० टक्केच्या आत आहे.
सर्वदूर रिमझिम पाऊसधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM
यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.
ठळक मुद्दे१४.८२ मिमी पाऊस : निम्न वर्धा प्रकल्पाची दो दारे उघडली