दंगल किंवा इतर हिंसक वातावरणात किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते. हा कर्फ्यू ठरावीक काळासाठी किंवा अनिश्चित काळासाठी लावला जातो. अशावेळी कर्फ्यू असेर्पयत लोकांनी घरातच राहायचं असतं. घराबाहेर पडायला परवानगी नसते. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला असेल. 22 मार्चच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाल्कनीतून टाळ्या, थाळ्या वाजवल्या असतील; पण घराबाहेर मात्र आईबाबांनी पडू दिलं नसेल कारण त्या दिवशी जनता कर्फ्यू होता. कर्फ्यू पोलिसांना लोकांवर कंपलसरी करावा लागतो.
जनता कर्फ्यू म्हणजे काय?
आपण कोरोना विषाणूशी युद्ध लढतो आहोत. हा विषाणू माणसं एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे माणसांनी घराबाहेर न पडणं आवश्यक आहे. म्हणूनच तुमची शाळाही बंद केली गेली आहे. तर जनता कर्फ्यू हा लादलेला नसतो. आपल्या भल्यासाठी आणि विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक घरी थांबावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.कुणी कुणावर लादलेला नाही तर जनतेनं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या इच्छेनं त्याचा स्वीकार केला होता म्हणून त्याला जनता कर्फ्यू म्हटलं गेलंय. जनता कर्फ्यू एक दिवसाचा असला तरी आपलं युद्ध सुरूच आहे. ते किती काळ चालणार आहे आता तरी माहीत नाही. त्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !