Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 19:49 IST2026-04-12T19:49:15+5:302026-04-12T19:49:41+5:30
भारतातील 'हे' गाव सर्वात थंड गाव आहे. हिवाळ्यात येथे तापमान -६० अंशांपर्यंत खाली जाते. या गावाबद्दलच्या रंजक गोष्टी...

Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
भारतातील सर्वात थंड ठिकाण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सियाचीन ग्लेशियर किंवा झांस्करचे नाव येते. पण तुम्हाला माहीत आहे का? भारतामध्ये एक असे गाव आहे जे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात थंड मानवी वस्ती असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. लडाखमधील 'द्रास' हे ते गाव असून, येथील थंडीचा कडाका इतका भीषण असतो की हिवाळ्यात तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरते.
भारताचे 'गेटवे टू लडाख'
कारगिल जिल्ह्यापासून साधारण ६४ किलोमीटर अंतरावर असलेले द्रास हे गाव 'गेटवे टू लडाख' म्हणून ओळखले जाते. हे गाव चोहोबाजूंनी १६,००० ते २१,००० फूट उंच पर्वतशिखरांनी वेढलेले आहे. हिमालयावरून येणारे थेट थंड वारे या गावाला अक्षरशः गोठवून टाकतात. एप्रिलच्या महिन्यात जेव्हा भारतात इतरत्र उष्णता वाढत असते, तेव्हा येथे तापमान ०°C ते -६०°C दरम्यान असते.
थंडीतही धडधडतंय मानवी जीवन
इतक्या थंड हवामानात राहणे ही एक मोठी कसरत आहे. मात्र, तरीही येथे बाल्टिक आणि नॉर्डिक जमातींचे सुमारे २२ हजार लोक राहतात. निसर्गाचे रौद्र रूप अनुभवत हे लोक आपले दैनंदिन जीवन जगतात. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद होतात, मात्र येथील लोकांची जिद्द आणि निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
पर्यटकांची प्रमुख आकर्षणे
द्रास हे केवळ थंडीसाठीच नाही, तर त्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. कारगिल युद्धातील शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेले स्मारक 'द्रास वॉर मेमोरियल', जगातील सर्वात धोकादायक मानला जाणारा घाटरस्ता 'झोजिला पास', पौराणिक कथेनुसार पांडवांची पत्नी द्रौपदीशी संबंधित असलेले 'द्रौपदी कुंड' हे कुंड, रानफुलांनी नटलेली एक सुंदर दरी 'मुश्को व्हॅली' ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
कसे पोहोचाल?
जर तुम्हाला या थंडीचा थरार अनुभवायचा असेल, तर तुम्ही विमानप्रवासाने श्रीनगर किंवा लेहपर्यंत पोहोचू शकता. तिथून टॅक्सीने नॅशनल हायवे १ वरून द्रास गाठता येते. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास जम्मू तवी हे सर्वात जवळचे स्टेशन आहे, जे तिथून ३८६ किलोमीटर अंतरावर आहे. द्रासला भेट देण्यासाठी उन्हाळा (मे ते सप्टेंबर) हा सर्वोत्तम काळ मानला जातो.