उल्हासनगरात कामगाराची हत्या; धक्क्याने पत्नीची आत्महत्या; दोन चिमुकल्या झाल्या अनाथ; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:36 IST2026-03-10T11:33:44+5:302026-03-10T11:36:31+5:30
कोणार्क कंपनीच्या एका सफाई कामगाराची सोमवारी दुपारी दारुड्या परप्रांतीय तरुणाने चाकूने वार करून हत्या केली.

उल्हासनगरात कामगाराची हत्या; धक्क्याने पत्नीची आत्महत्या; दोन चिमुकल्या झाल्या अनाथ; आरोपीला अटक
उल्हासनगर : कोणार्क कंपनीच्या एका सफाई कामगाराची सोमवारी दुपारी दारुड्या परप्रांतीय तरुणाने चाकूने वार करून हत्या केली. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे तीन आणि चार वर्षांची दोन मुले अनाथ झाली आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उल्हासनगर पालिकेने शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट कोणार्क इन्व्हायरो कंपनीला दिले आहे. या कंपनीत सफाई कामगार महादू जगताप हा काम करीत होता. सोमवारी दुपारी १२च्या सुमारास कॅम्प नंबर ३ मधील बॅरेक क्र. ८९६ परिसरात कर्तव्यावर होता. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून दुर्गेशकुमार गुप्ता या दारुड्या परप्रांतीय तरुणाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गुप्ता याने जगताप याच्यावर ३३ पेक्षा जास्त वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
जगताप हे पत्नी पूर्वी आणि दोन लहान मुलांसह शहाड गावठाण परिसरात राहत होते. पतीच्या हत्येची बातमी समजताच, पूर्वी हिने रुग्णालयात धाव घेतली. पतीचा मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. घरी परतल्यानंतर पूर्वी हिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.
न्याय मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय
घटनेचे पडसाद कामगारांमध्ये उमटले. कामगार संघटनेचे नेते संदीप गायकवाड यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आक्रमक पवित्रा घेत कामबंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत जगताप कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत कामबंद ठेवण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.