Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 08:28 IST2025-06-17T08:26:40+5:302025-06-17T08:28:18+5:30
Thane Rains: ठाणे जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून पावसाने झाेडपले.

Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
ठाणे: जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पावसाच्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागली. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या माळशेज डोगरावर रविवारी नवी मुंबईचे सात ते आठ ट्रेकर्स गेले असता, त्यांचे पथक प्रमुख साईराज धनंजय चव्हाण (२२ वर्षे) हे पाय घसरून दरीत पडले. ट्रेकर चव्हाण यांचा शोध लागला आहे. पण ते कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नाहीत. दरीतून त्यांना बाहेर काढणे पाऊस आणि धुक्यामुळे कठीण जात आहे, असे मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून पावसाने झाेडपले. मुरबाडच्या ऐतिहासिक सिद्धगडावर नवी मुंबईचे ट्रेकर्स रविवारी सकाळी ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी ३:३० वाजता पथक प्रमुख चव्हाण यांचा पाय घसरून ते खोल दरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुरबाड तहसीलदारांच्या यंत्रणेसह पाेलिस पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी भरपावसात सुरू असलेल्या या शोधकार्याला यश येऊन दुपारी ३:३० वाजता त्यांचा शोघ लागला.
गेरसे पुलाची पाहणी
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. ठाणे शहर परिसरात सोमवारी दिवसभरात सरासरी ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात ३६ मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात ५५ मि.मी. झाला तर उल्हासनगरला सर्वात कमी २० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसामुळे शहापूर तालुक्यातील दहागाव मुख्य रस्त्यावर झाड पडल्यामुळे वासिंद ते वाडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. पुण्याच्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे कल्याण व शहापूर तालुक्याला जोडणारा वासिंद शहरातील भातसा नदीवरील जुन्या गेरसे पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली.