मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूरमध्ये पाण्यासाठी पायपीट; एक दिवस टँकर येतो, पुढचे आठ दिवस पुन्हा कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:00 IST2026-03-13T08:00:16+5:302026-03-13T08:00:31+5:30
मुंबईची तहान भागवणाऱ्या आणि धरणांचा तालुका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये मार्चच्या मध्यातच पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे.

मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूरमध्ये पाण्यासाठी पायपीट; एक दिवस टँकर येतो, पुढचे आठ दिवस पुन्हा कोरडे
विशाल हळदे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : मुंबईची तहान भागवणाऱ्या आणि धरणांचा तालुका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये मार्चच्या मध्यातच पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, वैतरणा यासारखी मोठी धरणे तालुक्यात आहेत. मात्र, दुसरीकडे गावागावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा आणि आदिवासीबहुल तालुका असलेल्या शहापूरची सुमारे ३ लाख १३ हजार लोकसंख्या आहे. तालुक्यात जवळपास २२३ गावे आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या या तालुक्यात शेकडो आदिवासी पाडे आहेत. ठाकूर, कातकरी, वारली यासारख्या आदिवासी समाजाचे मोठे प्रमाण येथे आहे.
जिल्ह्याचे केंद्र असलेल्या ठाणे शहराचा चकचकीतपणा तर सोडाच, मात्र मूलभूत सुविधाही येथे नाहीत. विकासाच्या अनेक योजना कागदावरच आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असताना अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी तो नियमित नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आमच्या परिसरात मोठी धरणे आहेत. पण आमच्या घरात पिण्याचे पाणी नाही. टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. एक दिवस टँकर येतो आणि पुढचे आठ दिवस कोरडे जातात.
मंदा कवटे, पारधवाडी, शहापूर
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, वैतरणा अशी प्रमुख धरणे असलेल्या शहापूर तालुक्यात मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
हंडाभर पाण्यासाठी भांडणे
प्रशासनाकडून सापगाव नदीमधून टँकर भरून गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गावांची संख्या मोठी आणि टँकरची उपलब्धता कमी असल्याने अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी अनेकदा वाद होतात.
काही आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना दररोज २ ते ३ किलोमीटर अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागते. उन्हाच्या झळा, डोंगराळ रस्ते आणि हातात घागरी घेऊन चालणाऱ्या महिलांचे दृश्य अनेक गावांमध्ये पाहायला मिळते.