गांजाची तस्करी करणारे दोघे जेरबंद: दोन लाखांचा गांजा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 23:16 IST2021-08-23T23:04:23+5:302021-08-23T23:16:27+5:30
उडीसा येथून ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या अब्राहम मलीक (२८, रा. राकेश पोन्का, उडीसा) आणि चितू नायक (२५, रा. लोकलेटी, उडीसा) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांना ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणेनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उडीसा येथून ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या अब्राहम मलीक (२८, रा. राकेश पोन्का, उडीसा) आणि चितू नायक (२५, रा. लोकलेटी, उडीसा) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाखांचा २० किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर पुतळयाजवळील परिसरात गांजाच्या तस्करीसाठी दोघे जण येणार असल्याची ‘टीप’ पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश पगारे, उपनिरीक्षक बडे, पोलीस हवालदार धनंजय पाटील, संदीप चव्हाण, पोलीस नाईक अनिल चव्हाण, वैभव येडगे, प्रविण बांगर, सागर पाटील, विजय हिंगे आणि अंमलदार महेंद्र शेळकेआदींच्या पथकाने २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८.४० ते ११.२५ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ अब्राहम आणि चितू या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील अंगझडतीमध्ये दोन निळया रंगाच्या पिशव्यांमधून उग्र वासाचा २० किलो गांजा हस्तगत केला. भुवनेश्वर ते मुंबई या दरम्यानच्या प्रवासाचे रेल्वेचे तिकीट आणि ८२० रुपये रोख आणि गांजा असा दोन लाख ८२० रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केला. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट ८- अ, २०, २२ आणि २९ आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.