Thane Politics: व्याज-दंड माफीवरून सेना, राष्ट्रवादीत श्रेयवाद, ठाण्यातील म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:59 IST2022-04-05T10:57:28+5:302022-04-05T10:59:24+5:30

Thane Politics: सावरकरनगरमध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या असून त्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना - राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

Thane Politics: Army, NCP credentials on interest-penalty waiver, issue of 110 MHADA societies in Thane | Thane Politics: व्याज-दंड माफीवरून सेना, राष्ट्रवादीत श्रेयवाद, ठाण्यातील म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न

Thane Politics: व्याज-दंड माफीवरून सेना, राष्ट्रवादीत श्रेयवाद, ठाण्यातील म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न

ठाणे  : सावरकरनगरमध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या असून त्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना - राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. तर हा निर्णय आमच्यामुळेच झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

‘नाच ना जाने अंगण तेढा’ याप्रमाणे  राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे; मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग बारटक्के यांच्याकडून केले जात असल्याची टीका ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी केली.  नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे. यापूर्वी असे दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती; परंतु नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसऱ्याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. 

काम दुसऱ्याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत. ते कलियुगातील नारद आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न कोणी मार्गी लावण्यासाठी कितीवेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेले, किती अधिकाऱ्यांशी बोलले, ही प्रक्रिया कशी होती, किती वेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या, याचे पुरावे त्यांनी सादर केले तर आपण राजकारण सोडू. तसेच पुरावे सादर करता आले नाही तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचे पोस्टर्स लावावेत, असे आव्हान सरैय्या यांनी दिले आहे.

परांजपे यांनी निवडून यावे मग बोलावे
याबाबत बोलताना बारटक्के म्हणाले की, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या स्तरावर व्याज आणि दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.  
पाच वर्षे गायब असलेले सरैय्या आता निवडणुकांच्या तोंडावर या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परांजपे यांनी निवडणूक लढवून निवडून यावे आणि मग बोलावे असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Thane Politics: Army, NCP credentials on interest-penalty waiver, issue of 110 MHADA societies in Thane