Thane Metro: कासारवडवली ते वडाळा मेट्रो कधी सुरु होणार? प्रताप सरनाईकांनी दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:28 IST2026-01-07T17:28:14+5:302026-01-07T17:28:14+5:30
Thane Metro Update: कासारवडवली ते वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

Thane Metro: कासारवडवली ते वडाळा मेट्रो कधी सुरु होणार? प्रताप सरनाईकांनी दिली मोठी अपडेट
ठाणे : ठाण्यातील मेट्रो सेवा पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अद्याप सुरू झाली नसली, तरी येत्या तीन महिन्यांत ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन सरनाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. या कार्यक्रमाला युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले, “काही राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी केवळ वचननामे जाहीर करतात. मात्र, मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन करीत असून, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नागरिकांसमोर मांडत आहे, याचा मला अभिमान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार आम्ही राजकारण करीत असल्याचे सांगत सरनाईक यांनी विरोधकांवर टीका केली. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, त्यांना त्यांच्या नावाने बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. अनेक वर्षे मातोश्री आणि शिवसेनाभवनापासून दूर ठेवलेल्या व्यक्तीसोबत आज सत्तेसाठी हातमिळवणी केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
बिनविरोध निवडीविरोधात मनसेने निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक म्हणाले, “त्यांना न्यायालयात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांना बंधनकारक असेल.” कोस्टल रोड प्रकल्पाच्या श्रेयावरून बोलताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्न केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पुढे गेला. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय त्यांनाच जाते. मिरा-भाईंदरमधील शिवसेना-भाजप युती तुटण्याबाबत सरनाईक म्हणाले, नरेंद्र मेहता यांना भाजप ही खाजगी मालमत्ता असल्यासारखी वाटते. त्यामुळेच युती होऊ शकली नाही. याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती.