रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा
By अजित मांडके | Published: October 30, 2023 05:23 PM2023-10-30T17:23:27+5:302023-10-30T17:24:01+5:30
ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत.
ठाणे : राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरु केला आहे. संविधानातील कलम ३४० नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाहीत. आमच्या मराठा बांधवांच्या जीवाश खेळण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला आहे, असा सवाल करीत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठ्यांच्या साखळी उपोषणात सहभागी झाले.
ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी इंदिसे यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. आमचे बंधू मनोज जरांगे हे सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आता, मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतीय संविधानाच्या कलम ३४० मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की, जातगणना करुन एका समूहाला आरक्षण देणे शक्य आहे.
त्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३४० चा आधार घेऊन आयोगाची निर्मिती करावी, हा आयोग राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर राष्ट्रपती आदेश देऊन आरक्षणाचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही पटलांवर मांडण्याची सूचना करतील. त्यासाठी ओबीसी, एससी, एसटी या प्रमाणे नवीन सूची निर्माण करुन कोणच्याही आरक्षणला धक्का न लावता आरक्षण देता येईल. जर गुजरातमध्ये पटेलांना दिले जात असेल तर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले जात नाही? हे संसदेत बसलेले मराठा खासदार हे मोदींच्या भीतीमुळे त्या विरोधात बोलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता राज्यातील २८८ आमदारांनी पंतप्रधानांच्या घरासमोर बसून आपल्या मराठा बांधवांना टिकणारे आरक्षण मिळवून घ्यायला हवे असेही ते म्हणाले.