बारची तोडफोड करणाऱ्या ६ नेपाळींची पोलिसांनी काढली धिंड
By धीरज परब | Updated: December 9, 2025 13:21 IST2025-12-09T13:18:49+5:302025-12-09T13:21:06+5:30
Mira Road: काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारी असलेल्या बारची तोडफोड केल्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी ६ नेपाळींची रविवारी रात्री उशिरा धिंड काढली.

बारची तोडफोड करणाऱ्या ६ नेपाळींची पोलिसांनी काढली धिंड
-धीरज परब
मीरारोड- काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारी असलेल्या बारची तोडफोड केल्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी ६ नेपाळींची रविवारी रात्री उशिरा धिंड काढली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या काशिमीरा नाका येथे असलेल्या सारंग ह्या बार मध्ये ९ नेपाळी हे एका मित्राच्या लग्नाची पार्टी असल्याने दारू पिण्यास आले होते.मध्यरात्री उलटून सव्वा एक झाल्याने बार बंद करायचा असे कर्मचारी म्हणाले. त्यावरून त्यांची वादावादी सुरु झाली. एसी कक्षची लाईट बार मॅनेजर अस्लम शेख यांनी बंद केली. त्याचा राग येऊन नेपाळी टोळीने शेख सह अन्य काही कर्मचारी यांना मारहाण केली व बार मध्ये तोडफोड केली. ल्या नंतर बाहेर येऊन बारचा नामफलक देखील तोडला.
बार बाहेरील तोडफोडीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर बार मॅनेजर शेख याच्या फिर्यादी वरून ६ डिसेम्बरच्या रात्री काशिगाव पोलिसांनी करण भूल, महेश भूल, अभिषेक भूल, राजू भूल, रुपेश सिंग, सुरेश सिंग, रमेश भूल ह्या ७ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित लांडे व पथकाने तपास करून त्यांना पकडले. रविवारी रात्री उशिरा त्या सर्व नेपाळी आरोपींची काशिगाव पोलीस ठाणे बाहेरच्या परिसरात पोलिसांनी धिंड काढली. धिंड काढली असता तोडफोड करणारे आरोपी हे हात जोडून माफी मागत फिरत होते. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
तर एका पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार नेपाळी यांनी त्यांच्या कडील दारूच्या २ बाटल्या बाहेरून आणल्या असल्याने बार कर्मचारी ह्याने त्याचे ४०० रुपये वेगळा चार्ज लागेल असे सांगितले. त्या वरून नेपाळी टोळी व बार कर्मचारी यांच्यात वादावादी सुरु झाली अशी चर्चा आहे. तर सदर सारंग बार हा वेळेच्या नियमांचे उल्लंघन करून पहाटे पर्यंत चालत असताना पोलिसांनी सदर बार वर नाममात्र कारवाई केली. परंतु बारचा परवाना आणि बारचे अनधिकृत बांधकाम तोडण्या बाबत मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.