आता एका क्लिकवर रेशनकार्डची माहिती; चांगली वागणूक न दिल्यास दुकानदाराची करता येणार तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:07 IST2021-03-22T02:06:52+5:302021-03-22T02:07:11+5:30
जिल्ह्यातील बहुतांशी शिधावाटप दुकानदार शिधा पत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल अन्य किरणा सामान कमी, अधिक प्रमाणात वितरित करतात

आता एका क्लिकवर रेशनकार्डची माहिती; चांगली वागणूक न दिल्यास दुकानदाराची करता येणार तक्रार
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानांतील अन्नधान्य गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना वितरित केले जात आहे. या दुकानात सध्या काय माल आला, कार्ड अधिकृत आहे की नाही, या माहितीसह अन्नधान्याचा पुरवठा वेळेत व नियमित न केल्यास, अन्नधान्याचे वाटप न झाल्यास, शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक न दिल्यास संबंधित दुकानाची तक्रार ‘मेरा रेशन’अॅपद्वारे करता येणार असल्याने शिधावाटप दुकानदारांना लाभार्थींना सौजन्यशील वागणूक द्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी शिधावाटप दुकानदार शिधा पत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल अन्य किरणा सामान कमी, अधिक प्रमाणात वितरित करतात. काहींकडून धान्याचा पुरवठा न झाल्याचे सांगून सेवा देण्याचे टाळतात. मनमानी करणाऱ्या दुकानदारांची तक्रार दखल करण्यासाठी शासनाने अन्य दुकानावर अन्नधान्य घेण्याचा पर्याय (पोर्टेबिलिटी) कार्डधारकास दिला आहे. त्यामुळे मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यात ‘मेरा रेशन’ अॅपद्वारे माहिती मिळवण्याची व तक्रार करण्याची सुविधा होत असल्यामुळे शिधावाटप दुकानांवरील वॉच आता अधिक कडक करण्यात येत आहे. दरम्यान, तक्रार करण्यासाठी आता ‘मेरा रेशन’ या
अॅपद्वारे तक्रार करून दुकानदारांस वेठीस धरण्याच्या घटना वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिधावाटप दुकानातील कार्डसंबंधीच्या माहितीसह अन्नधान्य किती आले, त्यातून किती वाटप झाले, कार्ड अधिकृत आहे की नाही, अन्नधान्य, किराणा माल स्वस्त व माफक दराने वितरित होत आहे की नाही आदींची तक्रार व माहिती शिधापत्रिकाधारकास ‘मेरा रेशन’ या ॲपवर एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी या उपयुकत अॅपला शिधापत्रिकाधारकांना डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित दुकानाची माहिती मिळवण्यासह त्यातील कार्ड किती अधिकृत, किती बनावट, अन्नधान्याचे आतापर्यंत झालेले वाटप, शिल्लक आदींची माहिती या ॲपद्वारे त्वरित मिळवणे शक्य होत आहे. याचा नक्कीच फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.
शहरी व ग्रामीणमधील ९५ हजार कार्डधारकांचे अन्नधान्य बंद
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कार्डधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही. अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्य पुरवठा आता कायमचा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कार्डवरील अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी कोरोनामुळे नोकरीस मुकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना कार्ड देऊन त्यांचा अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांत त्यांच्या नावांचा समावेश केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही. तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत आहेत.