पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 04:37 PM2017-11-05T16:37:21+5:302017-11-05T16:39:01+5:30

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार आहे.

The Municipal Transport Committee will be revived after 12 years | पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

Next

राजू काळे
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार असून, तसा निर्णय येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत होण्याची शक्यता आहे. या समितीत निवडून आलेल्या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य नसल्याने त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह निकटवर्तीयांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजपा, सेना व काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मीरा-भार्इंदरमध्ये २००५ पुर्वी गोराई, उत्तन, चौक, मनोरी, ठाणे, भिवंडी येथे जाण्यासाठी प्रवाशांकडून स्थानिक परिवहनचे साधन म्हणून एसटीचा वापर होत होता. २००५ नंतर एसटी हद्दपार झाली असली तरी एसटीचा ठाणे पर्यंतचा प्रवास आजही भार्इंदर येथून सुरू  आहे. २००२ मध्ये मीरा-भार्इंदर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्याने २००५ मध्ये प्रशासनासमोर एसटीच्या जागी स्थानिक परिवहन सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित झाला.

अखेर पालिकेने १५ सप्टेंबर २००५ रोजी ती तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंत्राटी पद्धतीवर सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी व अपक्षांची सत्ता होती. पालिकेने स्वखर्चातून ५० बस खरेदी केल्या. त्यापैकी अंदाजे २० बस कंत्राटदारांकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सेवा सुरू करण्याचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आले. प्रतिकिलोमीटरमागे पालिकेने १९ रुपये दर निश्चित करून पालिकेने कंत्राटदार व राजकीय मंडळींचे भले करण्यास सुरुवात केली. यापोटी पालिकेला दरवर्षी लाखोंचा तोटा सहन करावा लागत असला तरी त्याचे सोयरसुतक ना कंत्राटदारांना, ना राजकीय मंडळी व ना प्रशासनाला होते. दरम्यान परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्येच पहिल्या वहिल्या १२ सदस्यीय परिवहन समितीची स्थापना २००५ मध्येच केली. त्यावर पहिले सभापती म्हणून शांताराम ठाकूर यांची निवड करण्यात आली. उर्वरीत सदस्यांत त्यावेळच्या स्थायी समितीचे सभापती तुळशिदास म्हात्रे, विद्याधर रेवणकर, रेनॉल्ड बेचरी, प्रशांत पालंडे, अशोक तिवारी, मुनीस विल्यम, उमा पाटील, सुनिता पाटील, उस्मान नुरले, चंद्रकांत मोदी, श्यामराव मदने व डॉ. सुरेश येवले यांचा समावेश होता.

या समितीसह विभागाचा कारभार हाकण्यासाठी २००७ मध्ये पुर्वीचे मुख्यालय असलेल्या नगरभवनमध्ये स्थानिक परिवहन विभागाचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन महापौरपदी असलेले अपक्ष नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेचा सतत वाढणारा तोटा असह्य होऊ लागल्याने पालिकेने २०१० मध्ये कंत्राटी सेवा मोडीत काढली. ९ आॅक्टोबर २०१० मध्ये खासगी-लोक सहभाग तत्वावरील नवीन परिवहन सेवा त्यावेळचे आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली. या नवीन सेवेच्या सुुरुवातीपूर्वीच २००९ मध्ये स्थानिक परिवहन समितीला नारळ देण्यात आला. त्यानंतर आजतागायत समितीची पुनर्स्थापना करण्यात आली नाही. मात्र येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत तिला पुनरुज्जीवित करण्याची शक्यता आहे. त्याला मान्यता मिळाल्यास लवकरच त्यात तौलनिक संख्याबळानुसार भाजपा, सेना व काँग्रेसला अनुक्रमे ९, २ व १ जागा मिळणार आहे. यातही भाजपाचाच वरचष्मा राहणार असल्याने त्याची दोर मात्र त्यावेळचे महापौर व सध्याचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हातीच राहणार आहे.

Web Title: The Municipal Transport Committee will be revived after 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.