डोंबिवली - महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गावांना परिस्थितीतून पूर्वपदापर्यंत आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी खासदारश्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
पूरस्थितीमुळे उध्वस्त झालेल्या गावी दत्तक घेतल्यास या गावांचे लवकर पूर्नवसन होऊन सदर गावांतील नागरिकांना इतर सोयी-सुविधां उपलब्ध होतील, असे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. त्यामुळे सदर पुरग्रस्त गावांतील नागरिकांना विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळणासाठी गावा-गावांना जोडणारे रस्ते आदी व्यवस्था पुर्ववत होण्यास विलंब होणार नाही, हा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.