मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 06:58 IST2026-04-05T06:58:14+5:302026-04-05T06:58:59+5:30
नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर/सफाळे: ‘ज्याने जीवनात प्रकाश दाखवला, शक्ती दिली अशा लोकांचा ज्यांना विसर पडतो त्याला कृतघ्नपणा म्हणतात. अशा ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ असा टोला वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही’, असे वक्तव्यही त्यांनी केले.
उद्धवसेनेचे उपनेते उदय पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सफाळे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, खा. डॉ. हेमंत सवरा, उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, वसई-विरारचे महापौर अजीव पाटील, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी आ. राजेश पाटील, सुनील भुसारा, विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
‘काही लोक व्यवहारासाठी राजकारणात जातात. काही पदासाठी... काही लपण्यासाठी... काही वाचण्यासाठी जातात...’ असा हल्लाबोल करतानाच राजन विचारे आणि विनायक राऊत यांना ‘माझी भाषा आपल्याला समजते का’, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नाईक यांच्या या वक्तव्यांमुळे पालघर, डहाणू नगरपरिषदेतील भाजप विरुद्ध शिंदेसेना कलह गडद होण्याची चिन्हे आहे.
ठाणे पालिकेच्या माध्यमातून अद्ययावत कार्डिएक ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेळप्रसंगी नवी मुंबईत आवश्यकता भासल्यास तत्काळ तिकडे पाठविली जाईल. प्रकृती काही वेळेस अचानक बिघडते. त्यामुळे वेळ पडली तर आम्ही त्यांच्यासाठी ही ॲम्ब्युलन्स पाठवून देऊ. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा पूर्ण इतिहास त्यांना कदाचित माहीत नाही. मी त्या बाबतीत बोलणे योग्य नाही, परंतु ठाण्याचा शिवसेनेचा जो इतिहास आहे, त्या इतिहासाने नाईकांचा पराभव केलेला आहे. हे सुद्धा त्यांनी विसरू नये.
-नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना