कल्याण: मरणानंतरही यातना संपेनात; मोबाइलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 06:08 IST2026-02-24T06:06:40+5:302026-02-24T06:08:35+5:30
स्मशानभूमीत लाकडावरील दहनासाठी दोन रैंक आहेत. परंतु, तेथे अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन आलेल्यांनाच वखारीतून लाकडे रॅकमध्ये ठेवावी लागतात.

कल्याण: मरणानंतरही यातना संपेनात; मोबाइलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार
कल्याण : मरणानंतरही यातना सुरूच असल्याची संतापजनक घटना आली. कल्याणमध्ये उजेडात गैरसोयीमुळे पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात स्मशानभूमीत प्रकाशाअभावी मोबाइल टॉर्चमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर शुक्रवारी ओढवली.
स्मशानभूमीत लाकडावरील दहनासाठी दोन रैंक आहेत. परंतु, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक तेथे नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन आलेल्यांनाच वखारीतून लाकडे रॅकमध्ये ठेवावी लागतात.
ज्या ठिकाणी रॅक आहेत त्या ठिकाणी दिवे नाहीत. त्याच्याबाहेर विजेचे दोन खांब आहेत. त्यापैकी एक दिवा सतत बंद-चालू होतो. परिणामी, ज्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात, तेथे पुरेसा प्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे लोकसेवा नगरमधून अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांनी मोबाइल टॉर्चचा आधार घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
दफनभूमीचीही दुरवस्था
बाजूलाच लहान मुलांसाठी दफनभूमी आहे. परंतु, देखभाल-दुरुस्तीअभावी त्या ठिकाणी झाडेझुडपे उगवली आहेत. त्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि अन्य कचरा असल्याने ही जागा दफन करण्यायोग्य राहिली आहे का, अशी शंका उपस्थित होते.
मित्राच्या जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले. पार्थिव स्मशानभूमीत आणले तेव्हा पुरेसा प्रकाश नव्हता. त्यामुळे मोबाइल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. येथे दिव्यांची व्यवस्था करता येत नसली तरी बाजूकडील भागातून पुरेसा प्रकाश आला तर अंधार राहणार नाही. -मनोज वाघमारे, रहिवासी, कल्याण (पूर्व)
...म्हणून येथे यावे लागते
पूर्वेसाठी विठ्ठलवाडी स्मशानभूमी आहे. परंतु, ती चक्कीनाका परिसरापासून लांब आहे. त्यात या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ असते. दुसरा पर्याय पश्चिमेकडील बैलबाजार स्मशानभूमी आहे.
त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढत जावे लागते. अंत्यसंस्कारासाठी जवळच्या चक्कीनाका येथील स्मशानभूमीचा आधार त्या परिसरातील नागरिकांकडून घेतला जातो.