मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 12:58 IST2018-03-03T12:58:04+5:302018-03-03T12:58:04+5:30

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली

Government Promises to give land for Rajasthani community | मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

मीरारोड - राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली.  इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी छत्तीस कौम एकता परिषद, जालोर-सिरोही विकास परिषद, राजस्थानी मेवाड प्रवासी संघ, ३६ कौम एकता मंडळ, पाली जिल्हा प्रवासी संघ, सिरोही -जालोर प्रवासी संघ यांनी संयुक्त पणे राजस्थानी होळी महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते.

महापालिकेच्या सभागृह, मंडईच्या इमारतींचे उद्घाटन आटपून मुख्यमंत्री होळी महासंमेलनात आले. वास्तविक राजस्थानी होळी कार्यक्रमासाठी ते आवर्जून भार्इंदरमध्ये आले होते. तशी जाहीर कबुलीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांचा खास राजस्थानी साफा घालून सत्कार करण्यात आला. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, नागोबा फौंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, संमेलनाचे आयोजक अध्यक्ष गोविंद राजपुरोहित, रतनसिंह राठोड, प्रताप पुरोहित आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने राजस्थानी समाज बांधव उपस्थित होते.

मीरा भार्इंदर हे मीनी राजस्थान असून राजस्थानी समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे असे आमदार मेहता म्हणाले. राजस्थानी जेवढे येतील तेवढी माहाराष्ट्राची भूमी गोड होत जाईल असं स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव केला आहे. त्याची मंजुरी शासनाकडून येत्या जयंती आधी मिळेल अशी आशा व्यक्त केली. शासनाने राजस्थानी समाजासाठी सरकारी भूखंड द्यावा अशी मागणी  मेहतांनी या वेळी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवातच आपल्या समोर संपूर्ण राजस्थान दिसत आहे अशी केली. मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या वेळी आलो असता गोविंद पुरोहित आदिंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही सर्व भाजपालाच निवडून देणार असे सांगितले होते. पण पालिका जिंकून दिल्यावर मात्र तुम्हाला होळीच्या कार्यक्रमाला यावे लागेल अशी अट पण टाकली होती. त्यानुसार आपण राजस्थानी होळी संमेलनास आल्याचे मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.

होळीच्या शुभेच्छा देतानाच होळी हा सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्याच सोबत पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. होळी साठी झाडं न तोडता कचरा, सुकी पानं - गवत आदींचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं . राजस्थानी समाजाने आपल्याला खूप प्रेम दिलं आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा सांगा, अर्ध्यारात्री येऊ. वर्षा हे तुमचंच घर आहे असं ते म्हणाले.

राजस्थानमधून येणारे प्रवासी असतील, उपचारासाठी येणारे लोक असतील त्यांच्यासाठी जागा हवी. समाजाने भूखंडाची मागणी केली असून नरेंद्र मेहता यांनी जागा शोधून द्यावी. ती जागा मंजूर करण्याचे काम शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर जय राजस्थान म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

 

Web Title: Government Promises to give land for Rajasthani community