ठाणे शहरातून बेपत्ता झालेली मुलगी मनमाडमध्ये सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:19 IST2026-04-01T12:19:39+5:302026-04-01T12:19:39+5:30
शोध लागल्यानंतर तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले

ठाणे शहरातून बेपत्ता झालेली मुलगी मनमाडमध्ये सापडली
ठाणे : ठाण्यातून बेपत्ता झालेली १४ वर्षाची मुलगी मनमाडमध्ये तिच्याच नातेवाइकांकडे मिळाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी दिली. शोध लागल्यानंतर तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ठाण्यातील इंदिरानगर, रूपादेवी पाडा क्रमांक दोन भागांत राहणारी आठवीत शिकणारी मुलगी मैत्रिणीकडे जाते, असे सांगून २९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता घराबाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. त्यामुळे नातेवाइकांसह तिच्या मित्र-मैत्रिणींकडे तसेच परिसरात तिचा कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती मिळाली नाही. अखेर तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करून तिच्या मामानेश्रीनगर पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी पहाटे ३ वाजता तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्थ लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रेश्मा कदम आणि हवालदार नितीश पाटील आदींच्या पथकाने तिचा मनमानमध्ये शोध घेतला. ती ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता एका नातेवाइकांकडे मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तिला ३१ मार्च रोजी पहाटे १ वाजता सुखरूप ठाण्यात आणले. मनमाडमध्ये जवळच्या नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने तिथे आपल्याच मर्जीने गेल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. मुलगी सुखरूप मिळाल्यामुळे मुलीच्या आईसह पालकांनी पोलिसांचे आभार मानले.