मीरा-भाईंदरमधील बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगला मुख्यमंत्र्यांचं अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 09:49 PM2017-10-18T21:49:53+5:302017-10-18T21:50:00+5:30
मीरा-भार्इंदरमधील रस्ते-फुटपाथ अडवून बसणारे बेकायदा फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगवर पालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी लोकशाही दिनात दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आश्वासन देऊन देखील अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार सजी पापाचन यांनी केला आहे.
![Chief Ministers abducted by illegal ferries and parking in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमधील बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगला मुख्यमंत्र्यांचं अभय Chief Ministers abducted by illegal ferries and parking in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमधील बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगला मुख्यमंत्र्यांचं अभय](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/mira-bhayandar_2017084309.jpg)
मीरा-भाईंदरमधील बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगला मुख्यमंत्र्यांचं अभय
मीरा रोड - मीरा-भार्इंदरमधील रस्ते-फुटपाथ अडवून बसणारे बेकायदा फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगवर पालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी लोकशाही दिनात दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आश्वासन देऊन देखील अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार सजी पापाचन यांनी केला आहे. काही फेरीवाला पथक कर्मचारी, पालिका अधिकारी तसेच काही नगरसेवकांचे फेरीवाल्यांकडून हप्ते बांधलेले आहेत. बेकायदा पार्किंग प्रकरणात देखील बार, हॉटेल, कार विक्रेते आदींकडून हप्ते मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचे सजी यांनी म्हटले आहे.
मीरा-भार्इंदर शहरामध्ये बेकायदा फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगची समस्या अतिशय ज्वलंत बनली आहे. शहरातील जवळपास सर्वच मुख्य व अंतर्गत रस्ते, पदपथ हे बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. ना फेरीवाला क्षेत्रात देखील सर्रास फेरीवाले बसले आहेत. यामुळे रस्ते व पदपथावरील अतिक्रमण सर्वामान्य पादचारी नागरिक तसेच वाहन धारकांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
एकीकडे फेरीवाला धोरण बनवले जात नसतानाच दुसरी कडे नागरीकांचा सर्वप्रथम हक्क असलेले रस्ते व पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्याने रहदारीला अडथला होत आहे. वाहतूक कोंडी तर पाचवीला पुजली असून यातून ध्वनी व वायुप्रदूषण होऊन इंधनसुद्धा वाया जात आहे. बेकायदा फेरीवाल्यांवरून रहदारीला अडथळा होत असल्याने यातून अनेक वादविवाद होत असून, काही प्रकरणांमध्ये तर हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत.
फेरीवाल्यांच्या विविध संघटना, स्थानिक राजकारणी व नगरसेवकांचा आशीर्वाद व पालिकेच्या फेरीवाला निर्मूलन पथकासह अनेक अधिका-यांचे पाठबळ असल्याने फेरीवाले मोकाट आणि मुजोर झाले आहेत. अनेक नगरसेवक, पालिका कर्मचारी-अधिकारी आदींना हप्ते बांधलेले असल्यानेच फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. वाहतूक पोलीससुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साजी पापाचन यांनी केलाय. फेरीवाल्याकडून दीड ते तीन हजार रुपयांपर्यंत महिना हप्ता बांधला गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
फेरीवाल्यांसह रस्त्यांवर उभ्या केल्या जाणा-या बेकायदा वाहन पार्किंगचा मुद्दा देखील त्यांनी हाती घेतलाय. शहरातील सर्वच रस्ते बेकायदा पार्किंगने अतिक्रमीत झाले असून या मळे देखील मोठी वाहतूक कोंडी होऊन रहदारीला अडथळा येतोय. परंतु वाहतूक पोलीस, पालिका हे या बेकायदा पार्किंग विरुद्ध कारवाई करत नाहीत. नो पार्किंग असून देखील बार, हॉटेल, कार व दुचाकी विक्रेते आदींचे हप्ते बांधलेले असल्याने त्या ठिकाणी बेकायदा उभ्या केल्या जाणा-या गाड्यांवर कारवाईच होत नाही.
रस्ते व पदपथावरील बेकायदा फेरीवाला व बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी आपण सातत्याने महापालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लोकशाही दिनात या बद्दल तक्रार केली होती. १२ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या दूरचित्रवाणी (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे झालेल्या लोकाशाही दिनात स्वत: ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मीरा-भार्इंदरमधील रस्ते, फुटपाथ अडवून बसलेल्या फेरीवाले तसेच बेकायदा पार्किंगवर कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.
पण आज चार महिने उलटले तरी महापालिका व पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना लोकशाही दिनात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे बेकायदा फेरीवाला आणि बेकायदा पार्किंग विरुध्द कारवाईच केली जात नसल्याचा आरोप साजी यांनी केलाय. एखादी थातुरमातुर वा खाना पूर्तीसाठी कारवाई केल्याचे नाटक केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनाच जर पालिका आणि पोलीस जुमानत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय ? असा प्रश्न त्यांनी केलाय.