भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 07:13 IST2025-07-06T07:13:04+5:302025-07-06T07:13:38+5:30
: तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्याने ठाण्यातील भाजप नेत्यांना आनंद झाला आहे.

भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
ठाणे : तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्याने ठाण्यातील भाजप नेत्यांना आनंद झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला बळ मिळाले व त्याचा फटका शिंदेसेनेला बसला, तर भाजपला फायदा होईल, असा त्या पक्षाच्या नेत्यांना होरा आहे. ठाणे महापालिका एकहाती आपल्याकडे राखणाऱ्या शिंदे यांना महापालिकेत सत्ता स्थापनेकरिता भाजपची गरज लागावी, हीच भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना जे जमले नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले या राज व उद्धव यांच्या विधानाने ठाण्यातील भाजप नेते सुखावले आहेत.
ठाणे जिल्ह्यात भाजपचे ९ आमदार आहेत, तर शिंदेंचे सहा आमदार आहेत. एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या ताब्यात असलेला ठाणे जिल्हा परत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भाजपने करून पाहिला. ठाणे लोकसभा मतदारसंघही शिंदेसेनेकडे गेला. २०१७च्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले. शिंदेसेनेची ही राजकीय ताकद भाजपला अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचे मनोमिलन ठाण्यात भाजपला दिलासा देणारे ठरले आहे. उद्धवसेनेशी ठाण्यात शिंदेसेना दोन हात करील व भाजपच्या समोर मनसेचे उमेदवार असतील. तसे झाल्यास भाजप व मनसे हे दोन्ही पक्ष बाळसे धरतील, असे परस्परपूरक राजकारण भाजप व मनसेचे नेते करण्याची दाट शक्यता आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेला युतीची अपेक्षा आहे, परंतु मुंबई वगळून इतर ठिकाणी युती न करण्याच्या विचारात भाजप आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेसेनेचा युतीचा आग्रह अधिक तीव्र होणार आहे. युती झाली, तर भाजपकडील उच्च मध्यमवर्गीय मराठी, गुजराती व उत्तर भारतीय मते शिंदेसेनेच्या उमेदवारांना सहज मिळतील. युती झाली नाही, तर शिंदेसेनेला बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. उद्धवसेनेकडे तीन ते चार नगरसेवक असून, राजन विचारे सोडले, तर ठाण्यात फारसा लढवय्या चेहरा नाही. मनसेने विधानसभा निवडणुकीत मार खाल्ला असला, तरी ठाणेकरांशी नाळ तोडलेली नाही. ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाण्यात उद्धवसेना आणि मनसेमधील मरगळ दूर होणार आहे. ठाण्यात ठाकरे बंधूमधील जागावाटप सोपे आहे. शिंदेसेनेत गेलेले काही माजी नगरसेवक व मातब्बर स्थानिक नेते ठाकरे बंधूंची युती झाल्याने व शिंदेसेनेत तिकीट मिळत नसल्याने पुन्हा उद्धवसेना, मनसेत येऊन उमेदवारी मिळवण्याची शक्यता वाढली आहे.
ठाकरेबंधू एकत्र आल्याने आपली शिवसेनेची मराठी मते घटली, तर ती भरून काढण्याकरिता भाजपसोबत असलेल्या गुजराती मतांवर शिंदेसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली 'जय गुजरात'ची घोषणा ही गुजराती मते शिंदेसेनेला ट्रान्सफर होण्याची खेळी मानली जाते.