भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच
By नितीन पंडित | Updated: September 17, 2022 16:59 IST2022-09-17T16:58:35+5:302022-09-17T16:59:33+5:30
चोवीस तासानंतरही दोन्ही मृतदेह सापडले नसून मृतदेहांचे शोधकार्य बचाव पथकामार्फत दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत.

भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच
भिवंडी - शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत होते. शहरातील वाहत्या नाल्यात व खाडीपात्रात वाहून गेल्याने पाच वर्षीय चिमुरडीसह एका ३६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्या आहेत. विशेष म्हणजे घटनेचौ चोवीस तासानंतरही दोन्ही मृतदेह सापडले नसून मृतदेहांचे शोधकार्य बचाव पथकामार्फत दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत.
गुलनाझ खातून मोहम्मद अख्तर अंसारी वय पाच वर्ष असे रा.आझमी नगर दिवानशाह दर्गारोड असे चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तिचे वडील नमाज पठण करून आल्यानंतर काही काळ विश्रांती घेत होते. यावेळी घराशेजारी असलेल्या नाल्यावर बनवलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लाकडी पुलावर गुलनाझ मैत्रिणीसह खेळत होती.यावेळी खेळता खेळता तिचा तोल गेल्याने ती नाल्यात वाहून गेली.घटनेनंतर तिच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी तिला शोधण्यासाठी प्रयत्न केले मात्र ती सापडली नाही.त्यांनतर मनपा आपत्ती विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सायंकाळी शोध घेतला मात्र ती मिळाली नसल्याने शोध मोहीम थांबवून पुन्हा शनिवारी सकाळपासून तिची शोध मोहीम सुरू होती मात्र चोवीस तास उलटल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत उबेदूर रहमान अंसारी वय ३६ वर्ष रा.शांतीनगर हा आपल्या भावासह शुक्रवारी सायंकाळी कांबेगाव येथे वीज कंपनीच्या एका खासगी कंत्राटदाराकडे विजेचे काम करत होता. यावेळी तो पाण्यात पडल्याने वाहून गेला.शनिवारी सायंकाळपर्यंत उबेदचा देखील मृतदेह सापडला नव्हता.निझामपुरा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही मृतदेहांची शोध मोहीम सुरू असून अजूनही दोन्ही मृतदेह सापडली नसल्याची माहिती भिवंडीचे निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे यांनी दिली आहे.