रिक्षा प्रवासात हरविलेल्या ९० हजारांचा टॅब आणि मोबाईल मिळाला सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 00:19 IST2021-12-13T00:03:37+5:302021-12-13T00:19:28+5:30
कोपरीतील मायानगर ते गौतमनगर असा रिक्षाने प्रवास करताना ५० हजारांचा टॅब आणि ४० हजारांचा मोबाईल असा ९० हजारांचा ऐवज मिस्टी इंदळेकर या रिक्षातच विसरल्या होत्या. त्यांचा हा ऐवज कोपरी पोलीसानी परत मिळवून दिला.

कोपरी पोलिसांनी घेतला शोध
ठाणे : कोपरीतील मायानगर ते गौतमनगर असा रिक्षाने प्रवास करताना ५० हजारांचा टॅब आणि ४० हजारांचा मोबाईल असा ९० हजारांचा ऐवज मिस्टी इंदळेकर या रिक्षातच विसरल्या होत्या. त्यांचा हा ऐवज परत मिळवून दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांनी रविवारी दिली.
कोपरीतील रहिवासी इंदळेकर या ११ डिसेंबर रोजी दुपारी मायानगर ते गौतमनगर असा रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्याचदरम्यान याच रिक्षाच्या सीटच्या पाठीमागे एका बॅगमध्ये टॅबसह दोन मोबाईल त्या विसरल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ममता डिसुझा आणि पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कमलाकर पाटील आणि पोलीस नाईक सतीश कुंदे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या रिक्षाचा शोध घेतला. तासाभरात इंदळेकर यांना त्यांचे हे दोन्ही मोबाईल परत मिळवून दिले.