कल्याण- डोंबिवली महानगरपालिच्या २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:22 IST2017-12-22T18:21:13+5:302017-12-22T18:22:06+5:30
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली

कल्याण- डोंबिवली महानगरपालिच्या २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार
डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाक्षेत्रामध्ये शहरी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरु असून केवळ २७ गावांना पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे २७ गावातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी आज अधिवेशनाच्या दिवशी औचित्याचा मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.
सद्यस्थितीत नांदिवली, भोपर, सोनारपाडा, स्टार कॉलनी, पी अॅण्ड टी कॉलनी गोळवली, पिसवली, आडीवली समर्थ नगर या गावांमध्ये आजदेखील टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत मा. जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्याच्या उपस्थितीत २ मे २०१७ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये २७ गावांना ५० एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे निर्देश दिले होते परंतु ४ ते ५ महिने होवूनही अद्यापही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच काटई नाका ते टाटा पावर पर्यंत पाण्याची जलवाहिनी कालबाह्य झालेली असून या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा काढण्यात आलेली असून सदर कामाला देखील लवकरात लवकर सुरवात होणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
सध्या २७ गावांमध्ये ३० ते ३५ एमएलडी पाणीपुरवठा सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू २७ गावांना केवळ २० एमएलडी पाणी होतो. सदरचा पाणीपुरवठा हा अतिशय कमी असून २७ गावांना कमीत कामी ६० एमएलडी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र केवळ २० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्यामुळे २७ गावांची पाण्याची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. येथील नागरिकांनी वारंवार आंदोलने, हंडा मोर्चे काढूनही २७ गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याकरिता आज विधानमंडळामध्ये औचित्याचा मुद्दा मांडण्यात आला तसेच जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी देखील करण्यात आली त्यावर मंत्रालयात तातडीने मिटिंग घेवून निर्णय घेण्यात येईल असे जलसंपदा मंत्री यांनी सांगितले आहे.
तसेच २७ गावांमध्ये वाढीव पाणीपुरवठा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याकरिता सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून पाणीप्रश्न त्वरित सोडविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या मागणीला आमदार रुपेश म्हात्रे, आमदार भरत गोगावले, आमदार रमेश लटके यांनी पाठींबा दिला.