Electricity Bill: वीजबिल अचानक वाढलंय? महावितरणकडे तक्रार करण्यापूर्वी 'हे' एक काम करा; हजारो रुपयांची होईल बचत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:45 IST2026-04-03T12:15:20+5:302026-04-03T12:45:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: सध्या सर्वत्र स्मार्ट मीटरच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आपले वीजबिल वाढून येत असल्याची ...

Electricity Bill: वीजबिल अचानक वाढलंय? महावितरणकडे तक्रार करण्यापूर्वी 'हे' एक काम करा; हजारो रुपयांची होईल बचत!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सध्या सर्वत्र स्मार्ट मीटरच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आपले वीजबिल वाढून येत असल्याची तक्रार आहे. मात्र, वीजबिलात होणाऱ्या या वाढीमागे केवळ मीटर कारणीभूत नसून, घरातील सदोष ‘अर्थिंग’ किंवा ‘न्यूट्रल लिकेज’ हे मोठे तांत्रिक कारण असू शकते. तांत्रिक भाषेत सांगायचे तर, तुमच्या घरातील वीज गळती तुमच्या नकळत मीटरमधील युनिट्स वाढवत असते, ज्याचा भुर्दंड शेवटी ग्राहकालाच सोसावा लागतो. आपल्या घरातील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी फेज आणि न्यूट्रल अशा दोन तारांची आवश्यकता असते. विद्युत प्रवाह फेजमधून उपकरणात जातो आणि न्यूट्रलद्वारे परत फिरतो. जेव्हा घराचे अर्थिंग कमकुवत होते किंवा न्यूट्रल वायरमध्ये दोष निर्माण होतो, तेव्हा वीज प्रवाहाचा काही भाग जमिनीकडे वाहू लागतो. स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असतात. हे मीटर फेज आणि न्यूट्रल या दोन्ही वायरमधील विद्युत प्रवाहाची स्वतंत्रपणे नोंद ठेवतात. जर तुमच्या वायरिंगमध्ये दोष असेल आणि वीज गळती होत असेल, तर स्मार्ट मीटर ती नोंदवतो.
वीज गळतीची मुख्य कारणे
अनेक वर्षांपासून न बदललेल्या वायर्सचे कोटिंग खराब होऊन भिंतीतून वीज गळती होऊ शकते. अर्थिंगचा खड्डा कोरडा पडणे किंवा तांब्याची पट्टी गंजणे यामुळे योग्य अर्थिंग मिळत नाही. फ्रीज, गिझर किंवा इस्त्री यांसारख्या धातूचे आवरण असलेल्या उपकरणांमधून वीज गळती होण्याची शक्यता जास्त असते. शेजाऱ्याच्या किंवा इतर सर्किटच्या न्यूट्रल वायरशी तुमच्या वायरिंगचा संबंध आल्यास मीटर वेगाने फिरू लागतो.
वीजबिल कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
आपल्या घरातील पूर्ण वायरिंगची 'इन्सुलेशन रेझिस्टन्स' टेस्ट परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी. घराच्या मेन स्विच बोर्डमध्ये 'अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर' किंवा आरसीसीबी बसवणे अत्यंत आवश्यक आहे. जर कुठेही वीज गळती झाली, तर हे उपकरण तात्काळ वीजपुरवठा खंडित करते, ज्यामुळे विजेचा धक्का बसण्यापासून बचाव होतो आणि बिलही वाचते. पावसाळ्यापूर्वी आणि उन्हाळ्यात अर्थिंगच्या खड्ड्यात पाणी व मीठ-कोळसा टाकून ओलावा टिकवून ठेवावा. स्मार्ट मीटर अचूक आहे तरी देखील जर अर्थिंग व्यवस्थित असूनही बिल जास्त वाटत असेल, तरच महावितरणकडे मीटर टेस्टिंगसाठी अर्ज करावा.