गुगल सोडा, आता चॅटजीपीटीचा जमाना! भारतातील ८०% तरुणाई 'या' कामासाठी करतेय एआयचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:55 IST2026-02-22T12:51:58+5:302026-02-22T12:55:18+5:30
भारतात चॅटजीपीटीचा वापर इतक्या वेगाने वाढला आहे की, देशातील एकूण मेसेजपैकी तब्बल ८० टक्के मेसेज हे ३० वर्षांखालील तरुणांकडून पाठवले जात आहेत.

गुगल सोडा, आता चॅटजीपीटीचा जमाना! भारतातील ८०% तरुणाई 'या' कामासाठी करतेय एआयचा वापर
एकेकाळी माहिती मिळवण्यासाठी गुगलवर अवलंबून असणारा भारतीय तरुण आता चॅटजीपीटीच्या प्रेमात पडला आहे. भारतात चॅटजीपीटीचा वापर इतक्या वेगाने वाढला आहे की, देशातील एकूण मेसेजपैकी तब्बल ८० टक्के मेसेज हे ३० वर्षांखालील तरुणांकडून पाठवले जात आहेत. यातही १८ ते २४ या वयोगटातील तरुणांचा वाटा सर्वाधिक म्हणजेच ५० टक्के इतका आहे. ओपनएआयने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून ही खळबळजनक पण रंजक माहिती समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कामाच्या ठिकाणी AIचा वाढता प्रभाव
भारतीय केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आपल्या करिअरला गती देण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. अहवालानुसार, भारतातील एकूण चॅटजीपीटी वापरापैकी ३५ टक्के वापर हा व्यावसायिक कामांसाठी केला जातो. हा आकडा जागतिक सरासरीपेक्षाही जास्त आहे. ऑफिसची कामे असोत, रिसर्च असो किंवा कंटेंट रायटिंग, भारतीय युजर्स आता एआयला आपला 'स्मार्ट असिस्टंट' मानू लागले आहेत.
कोडिंगमध्ये भारतीय अव्वल
भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी चॅटजीपीटीच्या 'कोडेक्स' या फीचरला डोक्यावर घेतले आहे. जगात इतर देशांच्या तुलनेत भारतीय युजर्स कोडिंगशी संबंधित प्रश्न विचारण्यात आघाडीवर आहेत. यामुळेच अँथ्रोपिकसारख्या कंपन्यांनीही मान्य केले आहे की, भारतातील एआय वापराचा मोठा हिस्सा हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी संबंधित आहे.
सॅम ऑल्टमन यांची भारतावर नजर; टाटांसोबत मोठी भागीदारी
ओपनएआयचे सर्वेसर्वा सॅम ऑल्टमन आता भारतात आपल्या साम्राज्याचा विस्तार करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस मुंबई आणि बेंगळुरूमध्ये कंपनीची कार्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ओपनएआयने टाटा समूहासोबत हातमिळवणी केली असून, टीसीएसच्या माध्यमातून 'चॅटजीपीटी एंटरप्राइझ' सेवा मोठ्या कंपन्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. पाइन लॅब्स, मेकमायट्रिप आणि इक्सिगो यांसारख्या मोठ्या भारतीय कंपन्या आधीच ओपनएआयसोबत काम करत आहेत.
सामान्यांना काय होणार फायदा?
सॅम ऑल्टमन यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या १४ महिन्यांत एआयद्वारे क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा खर्च १००० पटीने कमी झाला आहे. याचा थेट फायदा शिक्षण क्षेत्रात होणार असून, येत्या काळात भारतातील १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत एआय टूल्स विनामूल्य किंवा कमी दरात पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे.