एआय अपडेट: डिजिटल वसाहतवादाला उत्तर 'एआय फॉर पीपल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:00 IST2026-02-22T13:57:21+5:302026-02-22T14:00:35+5:30
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेली 'ग्लोबल एआय समिट' ही चालू वर्षातील सर्वात महत्त्वाची जागतिक घडामोड ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमन, सुरक्षितता आणि परिणामांच्या संदर्भात जागतिक पातळीवर ठोस चौकट उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे ही परिषद 'ग्लोबल साऊथ'मध्ये प्रथमच झाली आणि त्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले.

एआय अपडेट: डिजिटल वसाहतवादाला उत्तर 'एआय फॉर पीपल'
डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य)
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे उद्याच्या जगाचे वास्तव. उद्योग, अर्थकारण, कृषी, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, वाहतूक, दळणवळण, अवकाश संशोधन अशा सर्व क्षेत्रांत एआयमुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रसार सध्या बेलगाम असा आहे. जागतिक पातळीवर कोणतेही बंधनकारक करार, कन्व्हेन्शन किंवा नियमनाची एकसंध चौकट नाही. इंग्लंड, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये झालेल्या पूर्वीच्या परिषदांत सुरक्षा आणि नियमनावर भर होता; परंतु ठोस अंमलबजावणी यंत्रणा आकारास आली नाही. या पार्श्वभूमीवर भारतातील 'एआय इम्पॅक्ट परिषद' परिणामकेंद्री दृष्टीकोन मांडणारी ठरली.
भारतामध्ये सुमारे २० देशांचे प्रमुख सहभागी झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कॉर्पोरेट विश्वातील सुंदर पिचाई, सत्या नडेला, बिल गेट्स यांसारखे दिग्गजही सहभागी झाले. ही परिषद केवळ नियमनापुरती मर्यादित न राहता 'एआयचा लोकांवर आणि पृथ्वीवर होणारा परिणाम' या व्यापक विषयावर केंद्रित होती. त्यामुळे तिचा व्याप्तीगत विस्तार लक्षणीय ठरला.
भारताची एआय क्षमतांची झेप
स्टॅनफोर्डच्या ताज्या अहवालानुसार 'एआय व्हायब्रन्सी इंडेक्स'मध्ये अमेरिका प्रथम, चीन द्वितीय आणि भारत तृतीय क्रमांकावर आहे. अॅप्लिकेशन, मॉडेल, एनर्जी, चीप आणि इन्फ्रास्ट्रक्चर या पाचही स्तरांवर भारताने प्रगती साधली आहे. भारत आता एआय पेनिट्रेशनमध्ये 'टीअर-१' गटात सहभागी झाला आहे. १७५ अब्ज डॉलर खर्चुन विशाखापट्टणम येथे 'एआय सिटी' उभारण्याची योजना आहे. 'किसान मित्र' अॅप व 'भाषिणी'सारख्या उपक्रमांमुळे तंत्रज्ञानाचा लाभसर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या घडीला 'एआय'चे लोकशाहीकरण आवश्यक
जगात 'डिजिटल डिव्हायडेशन' प्रकर्षाने जाणवते. अमेरिका, युरोप आणि चीनकडे डेटासेट व कॉम्प्युटिंग संसाधनांची मक्तेदारी आहे. या पार्श्वभूमीवर 'एआय'चे लोकशाहीकरण आवश्यक आहे.
भारताने 'एआय फॉर पीपल, एआय फॉर प्लॅनेट, एआय फॉर प्रोग्रेस' ही उद्दिष्टे मांडली. स्थानिक भाषा, सर्वसमावेशकता, डेटाबेस आणि मूलभूत गरजांवर उपाययोजना यावर परिषदेत भर देण्यात आला.
परिषद ऐतिहासिक का?
पूर्वीच्या परिषदांत 'एआय'ची १ सुरक्षा आणि नियमनावर भर होता; मात्र दिल्लीतील परिषद परिणाम, सर्वसमावेशकता आणि विकासाभिमुख वापरावर केंद्रित होती.
५०० हून अधिक भाषणांमधून एआय साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न झाला. जनतेच्या मूलभूत गरजांसाठी एआय कसा उपयोगी ठरू शकतो, यावर ठोस विचारमंथन झाले. त्यामुळेच ही परिषद गुणात्मक दृष्ट्या ऐतिहासिक ठरते.
(लेखकाची मते व्यक्तिगत आहेत.)