Infosys अन् L&T नंतर आता Google चा आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:05 IST2025-03-03T15:04:47+5:302025-03-03T15:05:09+5:30
गेल्या काही काळापासून अनेक कंपन्यांच्या प्रमुखांनी जास्त तास काम करण्याबाबत वक्तव्ये केली आहेत.

Infosys अन् L&T नंतर आता Google चा आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला
गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Ai) तंत्रज्ञानाची वेगाने वाढ होत आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात या Ai तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. या Ai च्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी प्रत्येक टेक कंपन्या काम करत आहे. Goole देखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. अशातच, कंपनीचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 60 तास काम करण्याचा आणि दररोज कार्यालयात येण्याचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी दर आठवड्याला 70 तासांपेक्षा जास्त काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. तर, एलअँडटीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी तर 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. सोशल मीडियावर या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. काहींनी त्यांच्यावर टीका केली, तर काहींना त्यांचे समर्थन केले. दरम्यान, आता टेक जायंट Goolge नेदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.
रोज ऑफिसला येण्याचा सल्ला
गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी एका अंतर्गत मेमोमध्ये सांगितले की, Google Ai शर्यत जिंकू शकते. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. ब्रिनने आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचा सल्ला दिला. तसेच, कर्मचाऱ्यांनी 60 तास काम केले तर बरे होईल, असे म्हटले. काही कर्मचारी कमी काम करत आहेत, ज्यामुळे उर्वरित टीमच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो. टीम अथवा कंपनीसाठी हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
Ai च्या शर्यतीत पुढे राहण्याचा प्रयत्न
गुगलची एआय डेव्हलपमेंट टीम Gemini Ai वर काम करत आहे. ब्रिनच्या म्हणण्यानुसार, जर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बाजूने अधिक प्रयत्न केले, तर Google Ai जगात आघाडीवर राहू शकते. एआयची अंतिम शर्यत सुरू झाली आहे, ही जिंकण्यासाठी Google सर्वतोपरी प्रयत्न करेल. दरम्यान, ब्रिनच्या सल्ल्यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, आता टेक कंपन्या हायब्रीड वर्क पॉलिसीपासून मागे हटत आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.