जरूर दिवाळे निघेल, पण महाराष्ट्राचे नाही! शेतकऱ्यांची दिवाळी होईल; केसीआरनी सर्वच पक्षांवर तोफ डागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:28 IST2023-06-27T13:27:50+5:302023-06-27T13:28:50+5:30
KCR Maharashtra, Pandharpur Visit: आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले.

जरूर दिवाळे निघेल, पण महाराष्ट्राचे नाही! शेतकऱ्यांची दिवाळी होईल; केसीआरनी सर्वच पक्षांवर तोफ डागली
तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. यानंतर ते सरकोली येथील शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी आले. इथे त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा आम्हाला संधी देऊन पहा, इथे शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल करत भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांवर तोफ डागली.
मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. नव्या उदयाच्या दिशेने देशाला चालावे लागणार आहे. जगातील अनेक देश आपल्या समोरच कुठल्याकुठे पोहोचले आहेत. सा. कोरिया, जपान, सिंगापूर, मलेशिया, बाजुला चीन आहे. १९८२ पर्यंत चीन आपल्यापेक्षा गरीब होता. आज कुठे आहे, याचा विचार करावा लागेल. निवडणुका येतात, जातात कोणी ना कोणी जिंकत असतो. आजवर किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रात एक पक्ष सांगा ज्याला तुम्ही संधी दिली नाही. काँग्रेसला ५० वर्षे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला संधी दिलीत. करायचे असते तर यापैकी कोणीतरी केले असते. तेलंगानाच्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही केले जाऊ शकते. भालकेंनी तुम्हाला सर्व योजना सांगितल्यात. जर तेलंगानात या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रात का नाही. शेतकऱ्यांना विमा का नाही, तेलंगानात जे काही सुरु आहे, ते भुलभुलय्या आहे, ते केले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघेल असे सांगितले जात आहे, ते खोटे असल्याचे केसीआर म्हणाले.
जरूर दिवाळे निघेल, पण नेत्यांचे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. आम्ही कुठून पैसे आणतोय, लोकांची दिशाभूल केली जातेय. बीआरएस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले.
महाराष्ट्रात आताच आम्ही सुरुवात केलीय, एवढी धास्ती का आहे या पक्षांमध्ये? एवढे का घाबरलेत हे लोक? आम्हाला तर तीन चार महिनेच झालेत. मला समजतच नाहीय. भाजपा आरोप करतेय, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आम्हाला भाजपची बी टीम म्हटले आहे. आम्ही कोणाची टीम नाही, तर शेतकऱ्यांची, गरीबांची, दलितांची टीम आहोत, असे केसीआर म्हणाले. कोणत्याही पक्षाने म्हटलेले नाही की अबकी बार किसान की सरकार. का नाही म्हटले. ६०-७० टक्के लोक तर शेतकरी आहेत. हा पक्ष तेलंगाना किंवा महाराष्ट्रापुरती सिमीत पक्ष नाहीय. परिवर्तित भारत हेच सर्व समस्यांचे निराकरण आहे, असे केसीआर म्हणाले.