आध्यात्मिक; संकष्टी चतुर्थी आणि मनशांती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:23 IST2018-10-27T11:48:07+5:302018-10-27T13:23:31+5:30
कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

आध्यात्मिक; संकष्टी चतुर्थी आणि मनशांती !
चांद्र महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मंगळवार असेल तर ती संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ समजली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन सोडला जातो. काही लोक संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करतात. उपवास सोडताना जास्त जेवण घेणे योग्य नसते.
माणसाने इतरांशी माणुसकीने वागावे हे महत्त्वाचे असते. गरीब गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी उपवास सोडताना दान करावयासही सांगण्यात आले आहे. मात्र पूजा-उपवास करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावयाची असते. तसेच उपवास केल्यामुळे जर शरीराला त्रास होणार असेल तर उपवास केला नाही तरी चालतो. त्यामुळे पाप लागत नाही. उपवास असताना चुकून खाल्ले तरी पाप लागत नाही. परमेश्वर हा क्षमाशील आहे.
महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची साधीसोपी आणि सरळ व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य!
श्रीगणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो दु:खहर्ता आहे, सुखकर्ता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करून, अथर्वशीर्षाचे पाठ म्हणून, दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब-गरजूंना दान करून उपासाची पारणा केल्याने याच जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होण्यास मदत होते.
-