सोलापूरच्या पर्यटनाचे संशोधन व्हायला हवे : डॉ. मृणालिनी फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:02 IST2018-09-27T14:59:57+5:302018-09-27T15:02:46+5:30

सोलापूरच्या पर्यटनाचे संशोधन व्हायला हवे : डॉ. मृणालिनी फडणवीस
सोलापूर: सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथल्या पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटनस्थळांचे संशोधन व्हावे असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यानी केले.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेज पर्यटन विभगाच्या वतीने आयोजित सोलापूर भूईकोट किल्ले दर्शन उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संगमेश्वर एजुकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राजशेखर येळीकर, प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, पर्यटनविभाग समनवयक डॉ. राजकुमार मोहरकर उपस्थित होते.
डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहेत. पर्यटनाला सोलापूरमधे वाव असून पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा.
याप्रसंगी बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, सोलापूरचा इतिहास प्राचीन आहेमध्यवर्ती भागात भूईकोट किल्ला आणि सिध्दरामेश्वर मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. सध्या मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पर्यटनात वाढ होईल. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी मॉडर्न हायस्कूल, संभाजीराव शिंदे प्रशाला, सिद्धेश्वर प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्र संचालन प्रा. मेघा होमकर प्रास्ताविक डॉ. राजशेखर येळीकर यांनी केले आभार डॉ. मोहरकर यांनी मानले.