पंढरपूरला पुराचा विळखा; कोल्हापूर, सांगलीला दिलासा; नदीकाठच्या गावांची पूरस्थिती आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:34 IST2025-08-23T12:33:40+5:302025-08-23T12:34:28+5:30
पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक बंद

पंढरपूरला पुराचा विळखा; कोल्हापूर, सांगलीला दिलासा; नदीकाठच्या गावांची पूरस्थिती आटोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर / सोलापूर : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने कृष्णा कोयना, पंचगंगा, भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरला पंचगंगेचा तर सांगलीला कृष्णेचा वेढा पडला असून, कालच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाली असली तरी पूरसदृश परिस्थिती कायम आहे. पंढरपूरच्या भीमा नदीत एक लाख ७२ हजार क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूरची पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी शनिवारी धोका पातळीखाली आली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. आहे. सांगलीत कृष्णा नदीची पातळी दोन फुटांनी खाली आली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे सध्या एक फूट उघडे ठेवण्यात आले आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक बंद
पुरामुळे पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, विसर्गात झालेल्या घटामुळे नीराकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
गोदावरीत विसर्ग सुरूच
सलग दोन दिवस झालेल्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी नाशिक जिल्ह्यातील १६ धरणांमधून शुक्रवारीही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील २० धरणे तुडुंब आहेत. यंदा नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे.
निळवंडे धरणही भरले
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. शुक्रवारी निळवंडे धरण ही पूर्णक्षमतेने भरल्यामुळे या धरणातून प्रवरा नदी पात्रात ७ हजार २२० तर कालव्यांद्वारे ५२३ असे एकूण ७ हजार ८९० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते.