Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By आप्पासाहेब पाटील | Updated: June 18, 2025 22:13 IST2025-06-18T21:08:56+5:302025-06-18T22:13:21+5:30
Maruti Chitampalli Passes Away : अरण्यऋषी व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात निधन झाले.

Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात बुधवारी सायंकाळी निधन झाले.
दरम्यान, त्यांना नुकताच राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती, सायंकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.
सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.