सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:12 IST2025-06-25T11:11:43+5:302025-06-25T11:12:24+5:30
सुदैवाने या प्रकारामुळे विमानतळावर कुठलीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
सोलापूर - सोलापूर विमानतळावर सोमवारी एक विचित्र घटना घडली त्यामुळे वैमानिक काहीसे घाबरले. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी गोव्याहून आलेले विमान सोलापूर विमानतळावर लँड होताना एक कुत्रा अचानक आडवा आला. विमानासमोर जाणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. सुदैवाने यात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
या घटनेने पायलट जाम घाबरले असून त्यांनी फ्लाय ९१ कंपनीकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी गोव्याहून फ्लाय ९१ चे विमान सोलापूर विमानतळावर लँड होण्याची तयारी सुरू केली. बरोबर ८ वाजून ३० मिनिटांनी विमान लँड झाले, त्यावेळी पार्किंग जागेवर अचानकपणे एक कुत्रा विमानासमोर धावून जाताना दिसला. त्यामुळे सर्वांची धावपळ सुरू झाली. विमान पार्किंगच्या दिशेने येत असल्याने कर्मचाऱ्यांनाही पुढे जाता आले नाही. सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने कर्मचारीही तिथेच थांबले. विमानासमोर धावून जाणारा कुत्रा अचानक थांबला. त्यामुळे वैमानिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुदैवाने या प्रकारामुळे विमानतळावर कुठलीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांना विचारले असता, त्यांनी माहिती घेऊन सांगते असं उत्तर दिले. विमानतळावर घिरट्या घालणाऱ्या पक्षांचाही बंदोबस्त करण्याची मागणी विमानतळ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.
विमानतळावरील पीओपीचा भाग पडला
दरम्यान, सोलापूर विमानतळाचे लोकार्पण होऊन जवळपास ८ महिने उलटले आहेत. २८ कोटी रुपये खर्च करून विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले. २ दिवसापूर्वी विमानतळावरील वेटिंग रूमधील पीओपी छताचा काही भाग खाली पडल्याचे प्रवाशांना दिसून आले. त्यामुळे प्रवाशांनी तुटलेल्या पीओपीचे व्हिडिओ शुटींग करून सोशल मीडियावर व्हायरल केले. विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे मत सोलापूरकरांनी मांडले आहे.