नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी या अल्पावधीतच व्हायरल होत असतात. तसेच काही हॅशटॅग हे ट्रेडिंगमध्ये असतात. असाच एक हॅशटॅग हा सध्या तुफान व्हायरल झाला असून सध्या तो टॉप ट्रेंडमध्ये आहे. कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. याच दरम्यान अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर मोदी रोजगार दो हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर लाखो लोकांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. सर्वसामान्यांसोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच "सुनो जन के मन की बात" असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे.
आयएलओच्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी 57 टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये बेरोजगारी ही 47 टक्क्यांपर्यंत आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये 50 टक्के तर श्रीलंकेमध्ये 51 टक्के बेरोजगारी असून बांगलादेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 57 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. सीएमआयईईच्या अहवालानुसार 2020 मध्ये एक कोटी 11 लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. हरियाणामधील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे दाखवणारी घटना समोर आली आहे. पानीपतमधील न्यायालयामध्ये फक्त 13 शिपायांच्या पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या भरतीसाठी तब्बल 27671 तरुणांनी हजेरी लावली आहे. खरंतर या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही आठवी उत्तीर्ण असणारी हवी अशी अट आहे. मात्र या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी देखील अर्ज करुन भरतीसाठी भली मोठी रांग लावली होती. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही या पदासाठी अर्ज केल्याचं येथे उपस्थित असणाऱ्या अनेक तरुणांनी सांगितलं.