ट्रेन इथून हलणार नाही! सरकारी वकिलाची धमकी देत माय-लेकीचा राडा; शेवटी बेशुद्ध होण्याचं केलं नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:45 IST2026-03-13T13:19:48+5:302026-03-13T13:45:34+5:30
रेल्वेप्रवासात माय-लेकीने इतर प्रवाशांसोबत वाद घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेन इथून हलणार नाही! सरकारी वकिलाची धमकी देत माय-लेकीचा राडा; शेवटी बेशुद्ध होण्याचं केलं नाटक
Social Viral: प्रवासाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. मात्र, कधीकधी हाच प्रवास एखाद्या कुस्तीच्या आखाड्यासारखा वाटू लागतो. उत्तर प्रदेशातील सहारनपुरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे सीटवरून झालेल्या किरकोळ वादाने मोठे रूप धारण केले. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ७ मिनिटांच्या प्रवासासाठी सहप्रवाशांना वेठीस धरणाऱ्या माय-लेकीने केवळ गोंधळच घातला नाही, तर 'आम्ही सरकारी वकिलाच्या कुटुंबातील आहोत' अशी धमकी देत इतर प्रवाशांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, टीटीई ने समजावून सांगूनही या महिलांनी कोणाचेही ऐकले नाही.
ही घटना ५ मार्च २०२६ रोजी श्रीगंगानगर एक्सप्रेस (गाडी संख्या १४८१५) मध्ये घडली. प्रेमलता वर्मा आपल्या मुलीसोबत यमुनानगरहून प्रवास करत होत्या. त्याच डब्यात मुंडनाच्या कार्यक्रमासाठी हरिद्वारला जाणारे एक १२ जणांचे कुटुंबही प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, माय-लेकीला खालची सीट मिळाली होती, परंतु त्यांना मधल्या सीटवर झोपायचे होते. दुपारची वेळ असल्याने सहप्रवाशांनी बसण्यासाठी जागा मागितली, तेव्हा माय-लेकीचा पारा चढला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलांचा प्रवास अवघ्या ७ मिनिटांचा होता आणि सहारनपुर स्टेशन येणार होते, तरीही त्यांनी डब्यात मोठा गोंधळ घातला. "आमच्या कुटुंबात सगळे सरकारी वकील आहेत, तुम्हाला जेलमध्ये टाकू," अशी धमकी देत त्यांनी इतर प्रवाशांशी हुज्जत घातली आणि हाणामारी केली.
पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
या घटनेत आता एक नवीन वळण आले आहे. पीडित प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या महिलांविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. "पोलिसांनी लाच घेऊन आमची एफआयआर नोंदवण्यास नकार दिला," असा खळबळजनक आरोप प्रवाशांनी केला आहे.
बेशुद्द होण्याचे नाटक आणि शिवीगाळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, या महिलांनी सहप्रवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आम्हाला सीटवर बसलेल्या माणसासोबत सुरक्षित वाटत नाहीये, त्यामुळे इथे कोणीही बसणार नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली. वाद विकोपाला गेल्यावर जेव्हा लोकांनी विरोध केला, तेव्हा त्यातील महिला अचानक बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागली. यावर नेटकऱ्यांनी मार खाण्याची वेळ आली तेव्हा काकू बेशुद्ध झाल्या, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.
जीआरपीची कारवाई आणि झिरो एफआयआर
ट्रेन सहारनपुर स्टेशनवर पोहोचताच या महिलांनी थेट जीआरपी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने झिरो एफआयआर नोंदवला. हा वाद यमुनानगर परिसरात सुरू झाला असल्याने, पुढील तपासासाठी हे प्रकरण यमुनानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मग अख्खी ट्रेनच बुक करायची ना; नेटकऱ्यांची टीका
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. "जर तुम्हाला इतर प्रवाशांसोबत सुरक्षित वाटत नसेल, तर जनरल किंवा स्लीपर कोचमध्ये येण्याऐवजी पूर्ण कूपे किंवा एसी कोच बुक करायला हवा होता," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या माय-लेकीला सुनावले आहे.