मध्यरात्री घुसले घरांमध्ये पाणी, वेंगुर्ला शहर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:38 IST2020-09-23T16:37:08+5:302020-09-23T16:38:30+5:30
मुसळधार बरसणाऱ्या पावसाने ओहोळातील पाण्याची पातळी वाढल्याने वेंगुर्ला शहरातील काही भाग जलमय झाला. या पावसाचा जोर कायम राहिल्याने ओहोळातील पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसले.

वेंगुर्ला तालुक्यात पडलेल्या संततधार पावसाने वेंगुर्ला शहरातील हर्षद रेडकर यांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वेंगुर्ला : मुसळधार बरसणाऱ्या पावसाने ओहोळातील पाण्याची पातळी वाढल्याने वेंगुर्ला शहरातील काही भाग जलमय झाला. या पावसाचा जोर कायम राहिल्याने ओहोळातील पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसले.
वेंगुर्ला तालुक्यासह शहरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने ओहोळ दुथडी भरुन वाहत होते. सोमवारी या पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यरात्रीच्या सुमारास वेंगुर्ला-साकव ओहोळानजिकच्या अनिल कासकर, साईराज कासकर यांच्या घरामध्ये व पाव-बिस्किट भट्टीमध्ये, दिगंबर रेडकर यांच्या घरासह गिरणीमध्ये तर हर्षद रेडकर यांच्या घरामध्ये पाणी घुसले. तसेच येथील गौरव केशकर्तनालय या दुकानातही पाणी गेले.
राऊळवाडा येथील रामेश्वर फॅब्रिकेशन या दुकानाच्या मागील बाजूने पाण्याचा मारा बसल्याने या दुकानाची भिंत कोसळून नुकसान झाले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाढलेले पाणी घरात शिरल्याने आणि विद्युत पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
शहरातील अन्य ओहोळांमधील पाण्याची पातळी वाढल्याने येथील पाणी आजूबाजूच्या बागबागायतींमध्ये शिरत रस्त्यावरही आले. या पावसामुळे कापणीला आलेली भातशेती संपूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
कोरोनाने आधिच आर्थिक बाजू कोलमडली असून मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पावसाने संततधार कायम ठेवल्यास भातशेतीमध्ये पाणी साचून त्याचा मोठा फटका शेतकºयांना बसणार आहे.
परबवाडा गावालाही मोठा फटका
या मुसळधार पावसाचा फटका परबवाडा गावालाही बसला असून येथील मासुरा, गवंडेवाडा, भोवरवाडा, देसाईवाडा व कणकेवाडी या ठिकाणच्या घरांमध्ये पाणी घुसून लाखोंची हानी झाली आहे. मधुकर गवंडे यांचे पूर्ण घर कोसळून तर स्वप्निल परब व अजित गवंडे यांच्या घरांच्या भिती कोसळून नुकसान झाले असल्याची माहिती परबवाडा सरपंच पप्पू परब यांनी दिली.
पूरस्थिती आटोक्यात
तुळस, होडावडा, मातोंड, तळवडे आदी गावांचा संफ तुटला होता. तसेच या गावातील पुलांवर पाणी असल्याने येथील सर्व मार्ग ठप्प झाले होते. दरम्यान, मंगळवारी दुपार नंतर काही प्रमाणात पुरस्थिती आटोक्यात आली होती.
२६४.४ मि.मी. पाऊस
हा प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. तर एका दुकानाची भिंत कोसळून नुकसान झाले. वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यामध्ये २६४.४ मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.