वैभव नाईकांनी 'सिंधुरत्न'ची काळजी करू नये - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:31 IST2025-06-28T18:30:54+5:302025-06-28T18:31:35+5:30
लवकरच सिंधुरत्न'ला मुदतवाढ

वैभव नाईकांनी 'सिंधुरत्न'ची काळजी करू नये - दीपक केसरकर
सावंतवाडी: सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. हिशोब तपासणीची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे, अर्थमंत्री अजित पवारांकडे येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. ते शनिवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत की मडुरा येथे असा वाद होता. टर्मिनस सावंतवाडीतच असल्यानं गाडी तिथून सुटते व थांबते. रेल्वे टर्मिनसच्या उर्वरीत कामासाठी आणखी निधीची गरज आहे. कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते रखडल. त्यामुळे सिंधुरत्न मधून निधी देण्याची सोय केली आहे. पाण्याची समस्या होती. ती अडचण देखील आम्ही दूर केली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
दोनच भाषा सक्तीच्या
महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही. पाचवी नंतर हिंदी विषय अभ्यासक्रमात शिकवला जातो हे फार आधीपासून आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथीसाठी पर्यायी भाषा आहेत. सुकाणू समितीनं याबाबत निर्णय घेतला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत. कुठली भाषा घ्यावी हे विद्यार्थ्यांवर असेल नऊ आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकू शकता. मात्र, मराठी भाषा ही शिकावीच लागेल.
राज ठाकरे यांना चुकीची माहिती
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, मराठी ही सक्तीचीच आहे. १२ वी नंतरही पुढचं शिक्षण मराठीत व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण सुद्धा मराठीतुन घेता येणार आहे. मराठीसाठी आमच्या काळात जे केलं ते कोणीही केलेल नाही. राज ठाकरे यांना काही माहिती चुकीची दिली आहे. त्यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तूस्थिती सांगितली पाहिजे. त्यानंतर त्यांनी हा मोर्चा मागे घ्यावी अशी अपेक्षा आहे. तर मुलांच्या पुस्तकांचा बोजा सरकारनं कमी करावा ही माझी मागणी कायम असल्याचे केसरकर म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलावा
शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलण्यात यावा अशी मी मागणी केली असून लवकरच एमएमआरडीएची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडाला गेल्यास यांचा फायदा होईल. हा मार्ग शक्तीपीठाला जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणारे नुकसान देखील यामुळे टळू शकेल असं मत केसरकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सातार्डा पुल दूरूस्ती सुचना आपण अधिकारी वर्गांला देणार आहे. आंबोलीत दुर्घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात आहेत. यासाठी आवश्यक कीट त्यांना पुरविण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली.