देश महासत्ता बनण्यासाठी अभियानामागची पंतप्रधानांची भावना समजून घ्या, नितेश राणे यांचे आवाहन
By सुधीर राणे | Updated: October 9, 2023 17:50 IST2023-10-09T17:49:14+5:302023-10-09T17:50:03+5:30
कणकवली: आपण सर्व विविध गावातील नागरिक असलो तरी भारत देश म्हणून एकत्र असणार आहोत. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, ...

देश महासत्ता बनण्यासाठी अभियानामागची पंतप्रधानांची भावना समजून घ्या, नितेश राणे यांचे आवाहन
कणकवली: आपण सर्व विविध गावातील नागरिक असलो तरी भारत देश म्हणून एकत्र असणार आहोत. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, जी आपली कर्मभूमी आहे त्या मातीतील लोकांना सन्मान देणे, भारत देश म्हणून आपण एकत्रितपणे पुढे जाणे हा स्तुत्य हेतू 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला आहे. या अभियाना मागची पंतप्रधानांची भावना व विचार समजून घ्या. तसेच त्याप्रमाणे सांघिक काम केल्यास आपला देश लवकरच महासत्ता बनेल असे प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून 'मेरी माटी, मेरा देश' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या स्मरण प्रीत्यर्थ 'अमृत वाटिके'ची निर्मिती केली जाणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी कणकवली पंचायत समिती मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या अमृत कलश यात्रेची सांगता आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, जिल्हापरिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी काळे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, रवींद्र जठार, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, या कार्यक्रमादरम्यान सर्वांना देण्यात आलेली पंचप्राण शपथ ही प्रत्येकाने आत्मसात करून लोकप्रतिनिधी म्हणून अथवा देशाचा सुजान नागरिक म्हणून गावाला पुढे नेत असताना प्रत्येक क्षणाला त्या शपथेची आठवण झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमध्ये १०६ महसुली गावे आहेत. या गावांमधील माती पंचायत समिती येथे एकत्रित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत मातीचा कलश कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात आणण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पथनाट्य सादर करण्यात आले, त्यानंतर सर्व गावातील माती पंचायत समिती येथे एका कलशांमध्ये एकत्रित करण्यात आली. या कार्यक्रमाचे राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. तर विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी आभार मानले