महायुती सरकार बेरोजगारांच्या मुळावर उठले, कंत्राटी भरतीवरुन परशुराम उपरकरांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Updated: September 16, 2023 18:18 IST2023-09-16T18:16:45+5:302023-09-16T18:18:03+5:30
सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे

महायुती सरकार बेरोजगारांच्या मुळावर उठले, कंत्राटी भरतीवरुन परशुराम उपरकरांचे टीकास्त्र
कणकवली: सद्याचे महायुती सरकार हे बेरोजगारांच्या मुळावर उठले आहे. राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी वाढत असताना भरतीबाबत नोटीस काढत दोन ते चार वेळा भरतीप्रक्रिया पुढे ढकलली आहे. कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करून तरुणांची फसवणूक केली आहे. ही भरतीप्रक्रिया एजंटाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये आता राज्य सरकार भरती करणार आहे. त्या कंपन्यांना १५ टक्के देण्याचे धोरण निश्चित केले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी नोकऱ्या देण्यासाठी कंपनी नेमली. एजंट बेरोजगारांना गाठून लाखो रुपये घेऊन भरती होईल असे सांगत आहेत. मात्र, या भरती झालेल्या तरुणांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी राहणार का? याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे काही वर्षानंतर त्या तरुणांची नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. अशी भीतीही परशुराम उपरकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच तरुणांनी सावध व्हावे असे आवाहनही केले.
भरती झालेल्या तरुणांना ५ वर्षानंतर नोकरीची हमी राहणार नाही. या तरुणांच्या जीवाशी खेळण्याचं काम राज्य सरकारने चालवले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मनसेचा विरोध असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.