सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:25 IST2020-01-08T21:23:25+5:302020-01-08T21:25:48+5:30
सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यांचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज रात्री मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये मुंबई उपनगरची जबाबदारी आदित्य उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. तर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले आहे. तर रत्नागिरीची जबाबदारी मातोश्रीच्या जवळचे मानले जाणाऱ्या अनिल परब यांच्याकडे देण्यात आली आहे.
शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आणि राणेपूत्र निलेश राणे यांच्यामध्ये सख्य नाही. नुकतीच निलेश राणे यांनी सामंतांच्या पदवीवरून जोरदार टीका केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी सामंत यांनी डांबरातूनही पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद सांभाळणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती. मात्र, त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. परब हे कणकवलीच्या हरकुळ गावात मुळचे राहणारे आहेत.
निलेश राणे यांनी काय केली होती टीका?
राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. सामंत यांनी पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे, असा आरोप केला होता. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सावंतवाडीत येऊन निलेश राणे यांचे कान टोचले आहेत.
उदय सामंतांची पदवी खरीखुरी; चंद्रकांत पाटलांनी टोचले निलेश राणेंचे कान