Sindhudurg ZP Election Voting 2026: बांद्यात ईव्हीएममध्ये बिघाड; पहिला मतदानाचा हक्क बजावून 'ती' गेली लग्न मंडपात, जिल्ह्यात ११:३० वाजेपर्यंत २५.७२ टक्के मतदान
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 7, 2026 13:16 IST2026-02-07T13:15:35+5:302026-02-07T13:16:10+5:30
सिंधुदुर्ग : कोकणचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या ...

Sindhudurg ZP Election Voting 2026: बांद्यात ईव्हीएममध्ये बिघाड; पहिला मतदानाचा हक्क बजावून 'ती' गेली लग्न मंडपात, जिल्ह्यात ११:३० वाजेपर्यंत २५.७२ टक्के मतदान
सिंधुदुर्ग : कोकणचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन तासांच्या संथ प्रतिसादानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा वेग प्रचंड वाढला असून सकाळी ११:३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.७२ टक्के इतके भरघोस मतदान झाले आहे. माधवी दाभोलकर या नववधूने मतदान केंद्र परुळे केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन ती लग्न मंडपात गेली.
जिल्ह्यात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात (सकाळी ७:३० ते ९:३०) मतदारांचा प्रतिसाद काहीसा संथ होता, तेव्हा केवळ १०.६४ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या आणि दुसऱ्या टप्प्यात (९:३० ते ११:३०) मतदानाचा टक्का थेट २५.७२ टक्क्यांवर पोहोचला.
वरवड्यात पालकमंत्र्यांचे सहकुटुंब मतदान
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपला हक्क बजावला. "सिंधुदुर्गच्या विकासासाठी आणि नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे," अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
बांद्यात ईव्हीएममध्ये बिघाड
एकडे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना बांदा येथील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे मतदानाची प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. तांत्रिक पथकाने मशीन दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले, मात्र यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांचा काहीसा खोळंबा झाला.
दुपारी 'उन्हाचा कडाका', सायंकाळी 'धडाका'!
सध्या दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर काहीशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर पुन्हा एकदा मतदानाची मोठी लाट येण्याची शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली आहे. ८ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ४२ जागांवर कोण बाजी मारणार, याचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे.