सिंधुदुर्ग : महिला भगिनींना रोजगार देणे माझे कर्तव्य: दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:08 IST2018-12-27T13:06:55+5:302018-12-27T13:08:09+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. तुळससारख्या काथ्या सुविधा केंद्रांतर्गत १०० महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार देण्यात येणार आहे. महिलांना दोरी बनवायच्या मशीन देऊन घरच्या घरी दोरी बनवून ती पुन्हा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळसमार्फत विकत घेतली जाणार आहे. त्यामुळे गरीब महिलांच्या घरी लक्ष्मी नांदणार आहे, असा विश्वास मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

तुळस येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते काथ्या उद्योग समूह केंद्राचा शुुभारंभ झाला. यावेळी नितीन शिरोडकर, बाळू परब, शंकर घारे आदी उपस्थित होते. (रामचंद्र्र कुडाळकर)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. तुळससारख्या काथ्या सुविधा केंद्रांतर्गत १०० महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार देण्यात येणार आहे. महिलांना दोरी बनवायच्या मशीन देऊन घरच्या घरी दोरी बनवून ती पुन्हा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळसमार्फत विकत घेतली जाणार आहे. त्यामुळे गरीब महिलांच्या घरी लक्ष्मी नांदणार आहे, असा विश्वास मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत रिसोर्स बेस्ड इंटेसिव प्लानिंग अँड डेव्हलपमेंट पथदर्शी प्रकल्प अंतर्गत काथ्या प्रक्रिया उद्योग सामूहिक केंद्र्राचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व सावंतवाडीतील सांगेली या ठिकाणी करण्यात आला. यावेळी काथ्या मशिनचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, माजी सभापती बाळू परब, तुळस सरपंच शंकर घारे, मातोंड सरपंच जान्हवी परब, रणजित सावंत, लघू उद्योग महामंडाळचे राजेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक तसेच तुळस ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात १२ काथ्या प्रक्रिया केंद्रे
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेली ३ वर्षे अथक प्रयत्नांनंतर चांदा ते बांदा योजनेतून काथ्या उद्योग समूह स्थापन करून लघू उद्योग महामंडळ अंतर्गत हा प्रकल्प सुरू केला. त्यांनी फक्त घोषणा केली नाही, तर प्रत्यक्षात आणले आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ काथ्या प्रक्रिया केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, रोजगाराचे दालन उपलब्ध झाल्याने महिलांना आता घरबसल्या रोजगार मिळणार आहे. महिलांनी बनविलेले उत्पादन घेऊन तो स्वत: लघु उद्योग महामंडळ विक्री करणार आहे. त्याचा मोबदला ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना मिळणार आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.