स्वखर्चातून दिलेल्या गस्तीनौकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:21 IST2019-05-31T18:19:18+5:302019-05-31T18:21:26+5:30
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या गस्तीनौकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सत्ताधाऱ्यांनी व मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी कारणे पुढे न करता प्रत्यक्षात कारवाई करावी, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार नीतेश राणे यांनी स्वखर्चाने दिलेल्या गस्तीनौकेचे लोकार्पण करण्यात आले.
मालवण : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या गस्तीनौकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सत्ताधाऱ्यांनी व मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी कारणे पुढे न करता प्रत्यक्षात कारवाई करावी, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.
परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व एलईडीच्या घुसखोरीमुळे मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेला जात आहे. मत्स्य व्यवसाय खाते मच्छिमारांचे संरक्षण करण्यास कमी पडत आहे. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. शिवाय गेली पाच वर्षे सत्ताधारी गस्तीनौका उपलब्ध करून देणार असे सांगत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही. पोलिसांची गस्तीनौका वापरली जाते मात्र त्यावरून परप्रांतीयांची घुसखोरी थांबविण्यात अपयश येत आहे.
परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून मासळीची लूट केली जात आहे. त्यामुळे मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठीच गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचा शब्द मी दिला. त्यानुसार त्याची कार्यवाही झाली आहे. या गस्तीनौकेबाबत मत्स्य व्यवसाय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे.
येत्या काही दिवसात येथील कार्यालयास त्याबाबतचे पत्र प्राप्त होईल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत मत्स्य व्यवसाय खात्याला आधार, ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांनी कारणे पुढे करू नयेत. यापुढे कारणे दिल्यास त्याला मत्स्य व्यवसाय खाते, अधिकारी जबाबदार असतील. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी पाऊल उचलू असा इशारा राणे यांनी दिला.
यावेळी स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, छोटू सावजी, दाजी सावजी, दामोदर तोडणकर, अभय कदम, आबा हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.