शिवरायांच्या सागरी साम्राज्याचा आता होणार ‘सखोल’ अभ्यास!, मुंबई विद्यापीठाचे मालवणात ‘अध्यासन केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:14 IST2026-02-19T14:13:54+5:302026-02-19T14:14:52+5:30
५० लाखांच्या निधीला मंजुरी

संग्रहित छाया
मालवण : सिंधुदुर्गाच्या अथांग सागरात दडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि त्यांच्या आरमारी रणनीतीचा वारसा आता अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने जगासमोर येणार आहे. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार महत्त्वाच्या सागरी किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठामार्फत स्वतंत्र ‘अध्यासन केंद्र’ स्थापन करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात उतरले असून, याला शासकीय मान्यता लाभली आहे. मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात डॉ. ज्योती तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यरत होणार आहे. या निर्णयामुळे ऐतिहासिक संशोधनाला नवी उभारी मिळणार असून, पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
किल्ल्यांचा ऐतिहासिक दस्तावेज आणि संशोधनाला नवी गती
१. हे अध्यासन केंद्र केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बहुआयामी कार्य करणार आहे. या केंद्रामार्फत किल्ल्यांशी संबंधित जुनी कागदपत्रे, ऐतिहासिक दाखले आणि संशोधनात्मक प्रबंधांचे संकलन केले जाईल. विशेषतः युवा संशोधकांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार असून, तिथे विविध व्याख्यानमालांचे आयोजन केले जाईल.
२. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण केल्यामुळे भविष्यात या वास्तूंच्या संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. इतिहासाची पाने चाळताना नवीन पिढीला यातून संशोधनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
व्यापाराचे केंद्र आणि शिवरायांची दूरदृष्टी येणार प्रकाशात
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सागरी किल्ले उभारताना जी दूरदृष्टी ठेवली होती, त्याचा सखोल अभ्यास या केंद्राच्या माध्यमातून केला जाईल. शिवकाळात हे भाग व्यापाराचे प्रमुख केंद्र होते, त्यावेळच्या आर्थिक नीतीचे ऐतिहासिक दस्तावेज जमा करून त्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. संशोधनासाठी येणाऱ्या युवकांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून प्राथमिक सुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. जास्तीतजास्त युवकांनी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देश आणि राज्य घडवावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आणि सागरी किल्ले हे जागतिक इतिहासातील कुतूहलाचा विषय आहेत. मालवणात हे अध्यासन केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिक इतिहासतज्ज्ञांना बळ मिळेल आणि शिवरायांच्या जलदुर्गांचे वैभव पुराव्यांसह जगासमोर मांडता येईल. हा निर्णय सिंधुदुर्गाच्या अस्मितेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. - ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य