वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने केला तीन कोटींचा भ्रष्टाचार, वैभव नाईक यांची वनमंत्र्यांसह वनसचिवांकडे तक्रार
By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 16:57 IST2025-06-11T16:56:44+5:302025-06-11T16:57:21+5:30
तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने केला तीन कोटींचा भ्रष्टाचार, वैभव नाईक यांची वनमंत्र्यांसह वनसचिवांकडे तक्रार
कणकवली: कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.
कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तर १ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची विकासकामे मंजूर करून ती आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच वाटप केली असून प्रत्यक्षात कामे न करताच केवळ कागद रंगवून कामांची देयके काढली आहेत. शासकीय निधीत भ्रष्टाचार करून आता स्वतःची बदली परजिल्ह्यात करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कोणाचा पाठिंबा आहे, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत त्यांनी वनमंत्री, वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती, गवारेडे असे वन्यप्राणी शेती फळबागायतींचे नुकसान करीत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र, कायदे धाब्यावर बसवून शासकीय निधीत अपहार करण्यात व्यस्त आहेत.
अपहार लोकांना समजण्याअगोदर अधिकारी स्वतःची बदली परजिल्ह्यात करून घेण्याची नवीन पद्धत जिल्ह्यात रुजविली जात आहेत. अनेक शासकीय विभागात असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर सर्व कामांची सखोल चौकशी करावी. तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी तक्रार वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.
तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये
कणकवली वनपरिक्षेत्रासाठी जिल्हानियोजन मधून १ कोटी ३६ लाख ८४ हजार ३२ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्या निधीमधून कणकवली वनपरिक्षेत्राच्या विकासाची कामे मंजूर करणे आवश्यक असताना कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी अनावश्यक स्वरुपाची २१ कामे मंजूर केली आहेत. यापैकी एकाच मजूर संस्थेला एकूण १२ कामे देण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या काम वाटप नियमाचे (मजूर संस्था ३३ टक्के, सुशिक्षितबेरोजगार अभियंता ३३ टक्के, खुला प्रवर्ग ३३ टक्के) उल्लंघन करून उर्वरित ९ कामे देखील आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांची तसेच कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत त्यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.