पर्यावरण दिन विशेष: पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारूया; पर्यावरणाची हानी भावी पिढीसाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST2025-06-05T18:27:21+5:302025-06-05T18:28:09+5:30
पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ

पर्यावरण दिन विशेष: पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारूया; पर्यावरणाची हानी भावी पिढीसाठी धोक्याची घंटा
महादेव भिसे
आंबोली : गेल्या काही दशकांमध्ये पर्यावरणाची हानी झाली आहे. भावी पिढीसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे योग्यवेळी शहाणे होऊन प्रत्येकाने पर्यावरण या विषयाला प्रथम प्राधान्य देऊन नंतरच इतर विषय शिकले पाहिजे. पर्यावरण टिकण्यासाठी झटले पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. यात हवा, पाणी, जमीन आणि जीवाणूंचा समावेश होतो. आपण पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सोप्या उपाययोजना केल्यास पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.
पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, वृक्ष, माणूस, इतर वन्य प्राणी, आपल्या सभोवताली असलेले अनेक प्रकारचे वायू, निर्जीव घटक या सर्वांनी मिळून बनलेले वातावरण. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये मानवाचा चुकीच्या पद्धतीने झालेला हस्तक्षेप हा पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे.
आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ झालेला आहे.
वन्यप्राण्यांसमवेत निर्जीव घटकांचेही संवर्धन हवे
अगदी खाल्लेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा खिशामध्ये ठेवून तो कचराकुंडीत टाकण्याइतकी जनजागृती येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड असेल, नदी संवर्धन असेल, वन्य प्राणी संवर्धन असेल, इतकेच कशाला तर निर्जीव घटकांचे संवर्धनही तितकेच गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो, अन्यथा हा समतोल ढासळून निसर्गाच्या पर्यावरणाच्या क्रोधाला सामोरे जावेच लागणार आहे. पूर, वादळवारा, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक अशा प्रकारचे निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला भविष्यात बघावे लागेल. - प्रशांत जाधव, वन्यप्राणी छायाचित्रकार व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर
नागरिकांमध्ये जनजागृती हवी
जास्तीत जास्त झाडे लावली गेली पाहिजेत. पाणी योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, ते साठवले गेले पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. अनावश्यक ऊर्जा म्हणजेच वीज वापरण्यावरही बंधन पाहिजे. पर्यावरणाविषयी प्रत्येक नागरिकामध्ये जनजागृती कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. - राकेश देऊलकर, पर्यावरण अभ्यासक
प्रदूषणकारी प्रकल्पांना बंदी हवी
वाढते प्रदूषणकारी प्रकल्प यावर कायदेशीर बंधन आणणे गरजेचे आहे. अनधिकृत प्रदूषणकारी प्रकल्प बंद केले गेले पाहिजेत, जे प्रकल्प नदी प्रदूषित करत आहेत. त्या प्रकल्पांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येऊन कोणते ना कोणते पाऊल उचलून पर्यावरण संवर्धनास मदत केली पाहिजे. - रोहन कोरगावकर, पर्यावरण अभ्यासक, मुंबई (लालबाग)