सिंधुदुर्गात ४८ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा : तेलींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:20 IST2021-02-13T16:18:43+5:302021-02-13T16:20:23+5:30
grampanchyat bjp sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. तसेच इन्सुलीतील प्रकार म्हणजे भाजपला धक्का नसून, दोघेही सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने एक बाहेर गेल्याचे तेली म्हणाले.

सिंधुदुर्गात ४८ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा : तेलींचा दावा
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. तसेच इन्सुलीतील प्रकार म्हणजे भाजपला धक्का नसून, दोघेही सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने एक बाहेर गेल्याचे तेली म्हणाले.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, भाजप नेते अतुल काळसेकर, बड्या सावंत उपस्थित होते. तेली म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील ७० पैकी ४८ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा सरपंच बसणार आहे.
तसेच अन्य काही ग्रामपंचायतीही आपल्या ताब्यात येतील, असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरताना आज तीन ग्रामपंचायती अधिक ताब्यात येताना एकूण अठ्ठेचाळीस ठिकाणी भाजपची सत्ता आली असूनही काही ग्रामपंचायती गाव विकास पॅनेलकडे आहेत. ते संपर्कात असून हा आकडा अजूनही वाढेल. बुथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र राहून घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे.
गावच्या विकासासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न
तेली पुढे म्हणाले, इन्सुलीमध्ये सरपंच पदासाठी दोघे जण इच्छुक असल्याने आपली सत्ता गेली. याठिकाणी आम्ही कोणालाच थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. जिल्ह्यामध्ये जे भाजपाचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले, ते नवीन चेहरे आहेत. त्यांच्याकडून गावासाठी खूप चांगले काम आम्ही करून घेऊ. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच केंद्र सरकारच्या नवनवीन योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची टीम कार्य करेल. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना ट्रेनिंग देण्यात येईल.
ग्रामपंचायत निवडणुकीतील या घवघवीत यशानंतर आता जिल्हा बँक तसेच दोडामार्ग, कुडाळ आणि वैभववाडी या तीनही नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजप सत्ता खेचून आणेल, यासाठी बुथ रचना मजबूत करून भाजपाशिवाय दुसरा कुठलाच पक्ष विजयी होणार नाही, याची व्यूहरचना करण्यात आली आहे.