आंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:23 PM2021-01-05T17:23:41+5:302021-01-05T17:25:38+5:30

road safety Pwd Sindhudurg- सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

Anjiwade Ghat to be completed, Trisutri to be adopted: Mahadev's meeting of villagers in Kerwade | आंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार

आंजिवडे घाटमार्ग बैठकीत राजू मसुरकर यांनी मार्गदर्शन केले.

googlenewsNext
ठळक मुद्देआंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार महादेवाचे केरवडेत ग्रामस्थांची बैठक

माणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला सर्वात कमी अंतराने जोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट कुडाळ तालुक्यातील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यांच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव दरम्यान आहे. केवळ साडेचार किलोमीटर अंतराच्या या घाटाला चालना देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन महादेवाचे केरवडेतील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर केले होते.

यावेळी हा घाटमार्ग दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आता निर्णायक व आरपार लढा देण्याचे ठरले. यावेळी व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, दादा बेळणेकर, श्याम पावसकर, सुभाष भिसे, तुषार परब, एकनाथ केसरकर, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, श्रीकृष्ण नेवगी, नारायण लोहार, शंकर कोराने, कृष्णा पंदेरे, राजन गुरव, रामचंद्र कदम, विश्रांत केसरकर आदी उपस्थित होते. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला माणगाव खोऱ्यापुरता मर्यादित असलेल्या या लढ्यात आता राजू मसुरकर व सुनील दुबळे यांच्या माध्यमातून सावंतवाडी व वेंगुर्ला हे तालुकेही उतरले आहेत.

सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली, फोंडा, करूळ, भुईबावडा घाट मार्गांपेक्षा या घाटामुळे ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतरही ५५ किलोमीटरने कमी होणार आहे.
हा घाटमार्ग शिवकालीन पाणंद म्हणून परिचित आहे तसेच वसोली ग्रामपंचायतीत हा मार्ग २६ नंबरला यापूर्वीच नोंद केला आहे. याच मार्गाने ब्रिटीश काळात वेंगुर्ला बंदरात व्यापार चालत असे. या घाटाचे अंतर केवळ साडेचार किलोमीटरचे असून, घाटात केवळ एकमेव वळण लागते आणि एक किलोमीटर अंतराचा रस्ता आंजिवडेवासीयांनी श्रमदानातून तयार केला आहे.

गत सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या घाटाच्या सर्वेक्षणात अंदाजे खर्च ३२ कोटी रुपये इतकाच दाखविला आहे. त्यामध्ये एक मोठे वळण व चार-पाच लहान मोऱ्या निर्धारित केल्या आहेत. ही पाणंद शिवकालीन असल्याने वन खात्याने वीस फूट रुंदीचा मार्ग माथ्यापर्यंत झाडेझुडपे तोडून साफ केला आहे.

घाट अस्तित्वात आल्यास होणारे फायदे

या घाटामुळे सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर ११५ किलोमीटर तर वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतर १२५ किलोमीटर होणार आहे. माणगाव येथील प्रख्यात दत्त मंदिर, टेंबे स्वामी जन्मस्थळ, महादेवाचे केरवडेतील सिध्द महादेव मंदिर, मोरे येथील स्वप्ननगरी, ऐतिहासिक रांगणा व मनोहरमन संतोषगड, पाटगाव येथील मौनी महाराजांचा मठ, तांबालेचा महिला साखर कारखाना, गारगोटी येथील मौनी विद्यापीठ, भुदरगड, आदमापूरचे बाळू मामा, वेंगुर्ला बंदर, शिरोडा बंदर, चिपी विमानतळ, झाराप रेल्वे जंक्शन आदी असंख्य ठिकाणे व पर्यटनस्थळे यामुळे जोडली जाणार आहेत.

 

Web Title: Anjiwade Ghat to be completed, Trisutri to be adopted: Mahadev's meeting of villagers in Kerwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.