समुद्री राष्ट्रीय सुरक्षेसाठी एआय सीसीटीव्ही यंत्रणा बसवणार, सिंधुदुर्गमधील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:46 IST2025-10-15T17:01:45+5:302025-10-15T17:46:15+5:30
सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित; मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल

समुद्री राष्ट्रीय सुरक्षेसाठी एआय सीसीटीव्ही यंत्रणा बसवणार, सिंधुदुर्गमधील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित होणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यानुषंगाने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, मुंबई येथे सोमवारी (दि. १३ रोजी) बैठक झाली.
देवगड, मालवण व वेंगुर्ला पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विविध बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाकरिता असतात. तसेच बंदर परिसरातील हद्दीत संशयित दहशतवादी व गुन्हेगार लपून बसण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर देवगड, मालवण आणि वेंगुर्ला पोलिस ठाण्यांच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एआययुक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
सहा ठिकाणी बसणार यंत्रणा
या प्रकल्पासाठी देवगड पोलिस ठाणे येथे ४,५९,९५,८३५ रुपये, आचरा पोलिस ठाणे ३,७४,६३,६१३ रुपये, विजयदुर्ग पोलिस ठाणे २,८७,९८,१२१ रुपये, मालवण पोलिस ठाणे ४,५८,७७,७८३ रुपये, निवती पोलिस ठाणे ४,४६,२३,६८० रुपये आणि वेंगुर्ला पोलिस ठाणे ४,५५,४७,१३६ रुपये, एवढी अंदाजे रक्कम अपेक्षित आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेता संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना दिल्या आहेत.
हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकूण ९२ लँडिंग पॉइंट्स असून, या सर्व ठिकाणी पोलिस यंत्रणा अथवा सुरक्षा दल अधिकारी ठेवणे शक्य नाही. अशा ठिकाणी बंदरांच्या जेटीवर व जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाच्या दृष्टीने येत असतात. त्यातून समाजविघातक व संशयित दहशतवादी गुन्हेगार आदी येऊन लपून बसण्याची व राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिली.